रोहयोची १२ लाखांची मजुरी थकीत
By Admin | Updated: August 27, 2015 01:38 IST2015-08-27T01:38:10+5:302015-08-27T01:38:10+5:30
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हा परिषद प्रशासनाच्या नियंत्रणात १२ ही तालुक्यात रोजगार हमी योजनेची कामे सुरू आहेत.

रोहयोची १२ लाखांची मजुरी थकीत
तीन महिने उलटले : ८७५ मजुरांवर उपासमारीची पाळी
लोकमत विशेष
गडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हा परिषद प्रशासनाच्या नियंत्रणात १२ ही तालुक्यात रोजगार हमी योजनेची कामे सुरू आहेत. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून जिल्ह्यातील ८७५ रोहयो मजुरांची जवळपास १२ लाख रूपयांची मजुरी थकीत आहे. यामुळे रोहयो मजुरांवर उपासमारीची पाळी आली आहे.
राज्यासह जिल्हाभरातील मजुरांना १०० दिवसांचा रोजगार देण्यासाठी राज्य शासनाने रोजगार हमी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा परिषद, ग्राम पंचायत, वन विभाग व कृषी विभागामार्फत ५० टक्के ग्राम पंचायत स्तरावर व ५० टक्के यंत्रणास्तरावर कामे सुरू आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १५२ ग्राम पंचायतीमार्फत विविध गावात रोजगार हमी योजनेची कामे सुरू आहेत. यातून तीन हजारांहून अधिक मजुरांना रोजगार प्राप्त झाला आहे. रस्ते, बोडी, मजगी, वृक्षल् ाागवड, राजीव गांधी भवन, शौचालय बांधकाम, पिण्याच्या पाण्याची विहीर आदींची कामे सुरू आहेत.
रोजगार हमी योजनेच्या मजुरांना कामाची मजुरी थेट मजुरांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. यासाठी मजुरांचे जॉबकार्ड व बँक बचत खात्याला आधारकार्ड क्रमांक जोडणे अत्यावश्यक आहे. मजुरांच्या बँक खात्याशी आधारकार्ड लिकिंग करण्याचे काम गतवर्षीपासून सुरू झाले आहे. मात्र ग्राम पंचायतपातळीवर ग्राम रोजगार सेवकांमार्फत चुकीच्या सूचना जात असल्याने अनेक मजूर विविध बँक खात्याशी आधारकार्ड क्रमांक जोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. परिणामी नरेगा विभागाला मजुरांच्या बँक खात्यात मजुरीचे पैसे वळते करण्यासाठी प्रचंड अडचण जात आहे. जिल्ह्यातील अनेक रोहयो मजुरांनी ग्राम रोजगार सेवक तसेच ग्राम पंचायत प्रशासनाकडे चुकीचे बँक खाते क्रमांक दिले आहेत. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच अडचण झाली आहे. रोहयो मजुरी थकीत असल्यामुळे अनेक मजूर ग्राम पंचायत व पंचायत समिती कार्यालयात येरझारा मारीत आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)