अहेरीतील रस्ते झाले अरूंद
By Admin | Updated: June 14, 2015 01:54 IST2015-06-14T01:54:21+5:302015-06-14T01:54:21+5:30
येथील बसस्थानकासमोर गांधी चौक ते पेट्रोलपंपच्या मुख्य मार्गावर चहापान टपरी, गॅरेज, चिकन सेंटर आदींसह विविध अनेक दुकाने थाटण्यात आली आहे.

अहेरीतील रस्ते झाले अरूंद
अहेरी : येथील बसस्थानकासमोर गांधी चौक ते पेट्रोलपंपच्या मुख्य मार्गावर चहापान टपरी, गॅरेज, चिकन सेंटर आदींसह विविध अनेक दुकाने थाटण्यात आली आहे. सदर विक्रेत्यांनी रस्त्यावर आपल्या दुकानाचे साहित्य ठेवून अतिक्रमण सुरू केले आहे. वाढत्या अतिक्रमणामुळे अहेरीचा मुख्य मार्ग अरूंद झाला आहे. परिणामी वाहतुकीस अडथळा होत आहे. सदर समस्येने गंभीर रूप धारण करूनही पोलीस व नगर पंचायत प्रशासन अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईबाबत सुस्त असल्याचे दिसून येते.
भविष्यात अहेरी जिल्ह्याची निर्मिती होणार असल्याच्या आशेने अहेरी शहरातील भूखंडाचे भाव वधारले आहे. दुकानासाठी भाड्याची खोली, निवासाची खोली आदीसह दुकानाच्या पगडीचे भावही गगणाला भीडले आहेत. त्यामुळे अनेक नागरिक जागा मिळेल त्या ठिकाणी अतिक्रमण करून कब्जा करण्याचा सपाटा सुरू केला आहे. अहेरी जिल्हा निर्मितीनंतर अहेरी शहराची लोकसंख्या वाढणार असल्याने अतिक्रमण केलेली जागा मोठ्या भावात विकून आर्थिक लाभ पदरात पाडून घेण्याच्या बेतातही अनेक नागरिक असल्याचे दिसून येत आहे. अहेरी सुभाषनगर मार्गावर अहेरी बसस्थानक व नव्याने झालेल्या पेट्रोलपंपामुळे या मार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. आधिच अहेरीचा मुख्य मार्ग अरूंद आहे. त्यात आता अतिक्रमणाची भर पडत असल्यामुळे सदर मुख्य मार्ग अधिकच अरूंद झाला आहे. दुकानात येणारे अनेक ग्राहक रस्त्यावरच आपली दुचाकी व चारचाकी वाहने उभी करीत असल्याने वाहतुकीला प्रचंड अडथळा निर्माण होत आहे. वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.