रेपनपल्ली-कमलापूर रस्ता उखडलेलाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:54 IST2021-02-05T08:54:30+5:302021-02-05T08:54:30+5:30
३३ केव्ही उपकेंद्राचे काम थंडबस्त्यात आलापल्ली : वन कायद्यामुळे दुर्गम व अतिदुर्गम भागात महावितरणाला ३३ व ६६ केव्ही वीज ...

रेपनपल्ली-कमलापूर रस्ता उखडलेलाच
३३ केव्ही उपकेंद्राचे काम थंडबस्त्यात
आलापल्ली : वन कायद्यामुळे दुर्गम व अतिदुर्गम भागात महावितरणाला ३३ व ६६ केव्ही वीज उपकेंद्र उभे करण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही. ही जागा घेण्यासाठी तेवढी एमपीव्ही रक्कम भरावी लागते. राज्य सरकार ती भरण्यास तयार नसल्याने काम रखडले आहे.
मातीच्या बांधाचे प्रस्ताव धूळखात
आलापल्ली : वनविभागातर्फे दोन वर्षापूर्वी जंगलातील सहा स्थानांवर मातीचे बांध बांधण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सदर प्रस्ताव अजूनही धूळखात पडला आहे. बंधाऱ्यांची निर्मिती झाल्यास जलसाठ्यात वाढ होऊन पातळीत सुधारणा होऊ शकते.
सिरोंचा तालुक्यातील बसथांब्याची दुरवस्था
सिरोंचा : अहेरी ते गडचिरोली आगारातून सिरोंचा तालुक्याच्या ग्रामीण भागात बसेस सोडल्या जातात. प्रवाशांच्या सोयीसाठी प्रवाशी निवारे बांधण्यात आली आहेत. मात्र प्रवाशी निवाऱ्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे.
मालेवाडा परिसर समस्यांच्या विळख्यात
कुरखेडा : कोरची व धानोरा या दुर्गम भागांना जोडणारा मालेवाडा परिसर आजही शासन व प्रशासनाच्या नजरेत दुर्लक्षित आहे. या भागात ५० किमीच्या परिसरात केवळ एकाच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भरवशावर आरोग्यसेवा आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा द्यावा.
वनहक्क प्रकरणे रखडलेलीच
गडचिरोली : वनहक्क कायद्यानुसार वनजमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीला शासनाकडून वनहक्क प्रदान केले जाते. मात्र गडचिरोली जिल्ह्यात हजारो नागरिकांना अजूनही वनपट्टे प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे नागरिक कार्यालयांचे उंबरठे झिजवित आहेत.
‘अपडाऊन करणाऱ्या तलाठ्यांवर कारवाई करा’
चामोर्शी : तलाठ्यांना मुख्यालयी राहाण्याची सक्ती करावी, अशी मागणी दुर्गम भागातील नागरिकांनी केली आहे. जिल्हाभरातील तलाठी सजाच्या ठिकाणी ये-जा करतात. त्यामुळे शेतकरी व विद्यार्थ्यांची दाखल्यासाठी पायपीट होत आहे. सध्या तलाठ्यांनी रहिवासी व जातीचे दाखले देणे बंद केले आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे.
अहेरी बाजार परिसरात स्वच्छतेची ऐसीतैसी
अहेरी : शहरातील बाजार परिसरात अस्वच्छता पसरली आहे. नाल्यांची सफाई अनेक दिवसांपासून करण्यात आलेली नाही. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. नगर पंचायत प्रशासनाने संपूर्ण वॉर्डातील नाल्यांची सफाई करावी. घाण परिसराचीही स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
आलापल्लीत गतिरोधक तयार करण्याची मागणी
आलापल्ली : येथील नागमाता मंदिरात भाविकांची गर्दी दर्शनासाठी दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु या मार्गाने भरधाव वाहनांचे आवागमन असते. येथे गतिरोधक उभारावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या मार्गावरून दुचाकी, चारचाकी वाहनांसह अवजड वाहनांचेही आवागमन असते.
शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा
सिरोंचा : शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. न. पं. प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, मागील अनेक दिवसांपासून नागरिकांना त्रास होत असल्याने सदर कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
शेकडो कृषिपंपाचे वीज कनेक्शन प्रलंबित
सिरोंचा : भामरागड, सिरोंचा, एटापल्ली या तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषिपंपाचे वीज कनेक्शन देण्यात आले नाही. या तालुक्यातील अनेक शेतकरी वीज कनेक्शनच्या प्रतीक्षेत आहे. एकूण दीड हजारवर कृषिपंपाचे वीज कनेक्शन प्रलंबित आहेत.
शासकीय कार्यालयांमध्ये पसरली घाण
एटापल्ली : येथील अनेक कार्यालयात पसरलेल्या घाणीमुळे शासकीय कार्यालयातील स्वच्छता पाळण्याच्या प्रयत्नाला हरताळ फासली आहे. अनेक ठिकाणी घाण पसरली असल्याने बाहेर गाववरून येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
अंमलीपदार्थ्यांच्या सेवनामुळे आजारात वाढ
आष्टी : आहाराच्या बदलत्या सवयी, अंमलीपदार्थांचे सेवन, मद्यपान, धूम्रपान यामुळे अनेक गंभीर परिणाम समोर येत आहेत. अनेक जणांना आजाराची लागण होत आहे. त्यामुळे रुग्णालयात गर्दी वाढत आहे. प्रशासनाच्या वतीने अनेक ठिकाणी कारवाई होत नाही. त्यामुळे तंबाखूजन्य पदार्थ विक्रीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
शेतकऱ्यांना हस्तलिखित सातबारा पुरवा
देसाईगंज : ऑनलाइन सातबारा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरत असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना हस्तलिखित सातबारा तलाठी कार्यालयामार्फत पुरवावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. हस्तलिखित सातबारांअभावी शेतकऱ्यांकडून इंटरनेट कॅफेचालक आर्थिक लूट करीत आहेत.
डाक विभागाचे मुख्य कार्यालय गडचिरोलीत द्या
गडचिरोली : केंद्र सरकारच्या अखत्यारित येणारे डाक विभागाचे प्रधान कार्यालय चंद्रपूर येथे आहे. या कार्यालयामार्फत संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याचा कारभार चालतो. त्यामुळे प्रधान कार्यालय गडचिरोली येथे देण्यात यावे, अशी गडचिरोलीवासीयांची मागणी आहे.
सिरोंचा तालुक्यातील सौरदिवे नादुरुस्त
सिरोंचा : अतिदुर्गम भागात असलेल्या सिरोंचा तालुक्यातील आदिवासी गावात सौरदिवे लावण्यात आले. परंतु अनेक गावात लावण्यात आलेले सौरदिवे नादुरुस्त अवस्थेत आहेत. सौरदिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्याने सौरदिवे बेकामी झाले.
रस्त्यांवरील बांधकाम साहित्याने अडचण
आलापल्ली : शहरातील विविध भागात घराचे बांधकाम सुरू असून, बांधकाम साहित्य रस्त्यावर ठेवत आहेत. लोखंडी सळाख तोडण्याचे कामही रस्त्यावरच करण्यात येते. त्यामुळे अडथळा निर्माण झाला आहे.