एटापल्ली-जारावंडी रस्त्याची दुरवस्था
By Admin | Updated: May 10, 2014 00:12 IST2014-05-10T00:12:17+5:302014-05-10T00:12:17+5:30
एटापल्ली-जारावंडी या ५५ किमी मुख्य मार्गाची मागील अनेक वर्षांपासून दुरूस्ती करण्यात आली नाही. या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत.

एटापल्ली-जारावंडी रस्त्याची दुरवस्था
एटापल्ली : एटापल्ली-जारावंडी या ५५ किमी मुख्य मार्गाची मागील अनेक वर्षांपासून दुरूस्ती करण्यात आली नाही. या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. एटापल्ली-जारावंडी हा एटापल्ली तालुक्यातील मुख्य मार्ग आहे. या मार्गावर दुर्गम भागातील शेकडो खेडी आहेत. या खेड्यांमधील हजारो नागरिक एटापल्ली मार्गे पुढचा प्रवास करतात. एटापल्ली हे तालुक्याचे ठिकाण आहे. त्यामुळे एटापल्ली येथे प्रशासकीय कामासाठी हजारो नागरिक येतात. या मार्गाचे मागील अनेक वर्षापासून दुरूस्ती करण्यात आली नाही. डांबर टाकणे तर सोडाच मागील अनेक वर्षापासून मुरूमसुध्दा टाकण्यात आले नाही. त्यामुळे या मार्गावर मोठमोठ खड्डे पडले आहेत. नागरिकांना रस्त्यावरून मार्गक्रमण करण्यापेक्षा खड्ड्यांमधून प्रवास करीत असल्याचा भास होत आहे. खड्ड्यांमध्ये मार्ग शोधण्याची पाळी वाहनधारकांवर येत आहे. एटापल्ली येथे राहून ग्रामीण भागामध्ये सेवा देणारे ग्रामसेवक, शिक्षक दर दिवशी प्रवास करतात. खड्ड्यांमुळे बसणार्या झटक्याने नागरिकांना पाठीच्या कण्याचे त्रास वाढले आहेत. कसनसूर ते जारावंडी मार्गाची तर अत्यंत दूरवस्था झाली आहे. या मार्गावरून एखाद्या रूग्णाला नेणे कठीण झाले आहे. सदर मार्गाची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी) एटापल्ली-जारावंडी मार्गाची झालेली दूरवस्था.