रबी पिकांच्या उत्पन्नात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 05:00 AM2020-03-25T05:00:00+5:302020-03-25T05:00:46+5:30
चामोर्शी तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरात खरीप हंगामात धान हे प्रमुख पीक घेतले जाते. धानपीक निघाल्यानंतर शेतकरी आपल्या शेतात तूर, मुग, उडीद, चना, पोपट, वाल, बरबटी आदी कडधान्याच्या पिकांची लागवड करतात. यावर्षी रबी हंगामातील पिकांचे दाणे भरीत असताना वातावरणात बदल होऊन अवकाळी पाऊस बरसला, गारपीट झाली. दोन ते तीनदा हे संकट गडचिरोली जिल्ह्यात शेतकऱ्यांवर आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : चामोर्शी तालुक्याच्या जिल्ह्यातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे. येथील शेतकरी खरीप व रबी अशा दोन्ही हंगामात विविध पिकांचे उत्पादन घेतात. सध्या रबी पिकाची काढणी आटोपली असून मळणीचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा रबी पिकांच्या उत्पादनात कमालीची घट दिसून येत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
चामोर्शी तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरात खरीप हंगामात धान हे प्रमुख पीक घेतले जाते. धानपीक निघाल्यानंतर शेतकरी आपल्या शेतात तूर, मुग, उडीद, चना, पोपट, वाल, बरबटी आदी कडधान्याच्या पिकांची लागवड करतात. यावर्षी रबी हंगामातील पिकांचे दाणे भरीत असताना वातावरणात बदल होऊन अवकाळी पाऊस बरसला, गारपीट झाली. दोन ते तीनदा हे संकट गडचिरोली जिल्ह्यात शेतकऱ्यांवर आहे. याचा फटका रबी हंगामातील कडधान्य व तेलवर्गीय पिकांना बसला. परिणामी यावर्षी उत्पादनामध्ये घट आल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले आहे. यंदाच्या रबी हंगामात चामोर्शी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कडधान्य पिकाची लागवड केली. विशेष म्हणजे, या तालुक्यात लाखोळी व तूर हे पीक प्राधान्याने घेतले जाते. सदर दोन्ही पिके ऐन गर्भात असताना ढगाळी वातावरणाचा फटका या पिकांना बसला. परिणामी कडधान्याचे उत्पादन २५ टक्के झाल्याचे तालुक्यातील अनेक शेतकºयांनी सांगितले आहे. मजुरांच्या मजुरीचा खर्च तसेच लागवडीचा इतर खर्च भरून निघत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. जनावरांच्या वैरणाची व्यवस्था व्हावी, यासाठी अनेक शेतकºयांनी आपल्या शेतातील कडधान्य पिकाची मळणी केली. मळणीचाही खर्च वाढत असून यंदा रबी पीक लागवडीचा खर्च शेतकऱ्यांच्या माथ्यावर बसला आहे.
गावठी आंब्याची चव महागणार
फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस व मार्च महिन्याच्या दुसºया व तिसºया आठवड्यात जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसला. वादळासह गारपीट झाला. परिणामी आंब्याचा बहर गळून पडला. आमराईमध्ये आंबे गळून पडले. त्यामुळे यंदा गावठी आंब्याचे उत्पादन घटणार आहे. परिणामी यंदा गावठी आंब्याची चव महाग होणार आहे.