रेती लिलावातून १०२ कोटींचा महसूल प्राप्त
By Admin | Updated: September 4, 2016 01:59 IST2016-09-04T01:59:16+5:302016-09-04T01:59:16+5:30
रेती घाटांच्या लिलावातून २०१५-१६ या आर्थिक वर्षात शासनाला तब्बल १०२ कोटी ८३ लाख ७८ हजार ११० रूपयांचा महसूल मिळाला आहे.

रेती लिलावातून १०२ कोटींचा महसूल प्राप्त
तीन टप्प्यात लिलाव : यावर्षी उत्पन्न वाढणार
गडचिरोली : रेती घाटांच्या लिलावातून २०१५-१६ या आर्थिक वर्षात शासनाला तब्बल १०२ कोटी ८३ लाख ७८ हजार ११० रूपयांचा महसूल मिळाला आहे. २०१६-१७ मध्ये महसूलात वाढ होण्याची शक्यता जिल्हा खनिकर्म विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
२०१५-१६ या वर्षात पहिल्या टप्प्यात ४२ रेती घाटांचा लिलाव करण्यात आला. या रेतीघाटांची ५ कोटी ६३ लाख ३ हजार रूपये एवढी अपसेट प्राईस ठेवण्यात आले होते. प्रत्यक्ष लिलावाच्या माध्यमातून ६ कोटी १४ लाख ७८ हजार रूपयांचा महसूल प्राप्त झाला. जानेवारी २०१६ या महिन्यात ११ रेती घाटांचा लिलाव करण्यात आला. १ कोटी ९३ लाख ७२ हजार रूपये अपसेट प्राईस ठेवण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र या रेती घाटांचा लिलाव २ कोटी ९८ हजार रूपयांना झाला. तिसरा टप्पा फेब्रुवारी २०१६ मध्ये पार पडला. यामध्येही पाच रेती घाटांचे लिलाव झाले. या लिलावाच्या माध्यमातून ४५ लाख ३५ हजार रूपयांचा महसूल मिळाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी जास्त महसूल प्राप्त होण्याची अपेक्षा महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मात्र त्यासाठी लिलावाची प्रक्रिया वेळेवर होणे अत्यंत आवश्यक आहे. (प्रतिनिधी)