संशोधनातून समाजाचे वास्तव पुढे यावे
By Admin | Updated: February 23, 2016 01:59 IST2016-02-23T01:59:12+5:302016-02-23T01:59:12+5:30
सामाजिक शास्त्रांच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या संशोधनातून विविध भागात राहणाऱ्या समाजाचे व मानवी

संशोधनातून समाजाचे वास्तव पुढे यावे
गडचिरोली : सामाजिक शास्त्रांच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या संशोधनातून विविध भागात राहणाऱ्या समाजाचे व मानवी जीवनाचे वास्तव पुढे आले पाहिजे, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर यांनी केले.
विदर्भ मराठी समाजशास्त्र परिषदेचे सहावे राज्यस्तरीय अधिवेशन गोंडवाना विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाच्या उद्घाटनीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. अधिवेशनाचे उद्घाटन मुंबई विद्यापीठाच्या समाज विज्ञान शाखेच्या समाजशास्त्र विभागप्रमुख तथा अधिष्ठाता डॉ. स्मिता अवसार यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून कुलसचिव डॉ. विनायक इरपाते, विदर्भ मराठी समाजशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. बी. एम. कऱ्हाडे, सागर विद्यापीठ औरंगाबादचे डॉ. दिवाकर राजपूत, डॉ. बी. के. स्वाई आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर म्हणाले की, मानवी जीवन पद्धतीत सतत बदल होत राहते. हे बदल योग्य पद्धतीने होण्यासाठी संशोधन अत्यंत महत्त्वाची भूमिका बजाविते. विकास होत चालला असला तरी माणसाचे समाधान मात्र कमी होत चालले आहे. हा स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे. माणसातील दरी वाढत चालली आहे. याचाही अभ्यास होणे गरजेचे आहे, असेही डॉ. कल्याणकर यावेळी म्हणाले. कार्यक्रमादरम्यान आचार्य पदवी प्राप्त केलेल्या डॉ. पी. एन. वाघ, डॉ. सुरेश डोहणे यांचा सत्कार करण्यात आला. संचालन विद्यार्थी कल्याणचे संचालक डॉ. ईश्वर मोहुर्ले तर आभार प्रा. डॉ. ए. एन. सालोटकर यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)
नोकरी टिकविण्यासाठी होत आहे पीएचडी
४उद्घाटनीय भाषणादरम्यान डॉ. स्मिता अवसार यांनी पीएचडीपासून खऱ्या अर्थाने संशोधनाला सुरुवात होते. पीएचडी ही संशोधनाची पहिली पायरी आहे. मात्र आपल्याकडे पीएचडीनंतर संशोधनच बंद होते. केवळ नोकरी टिकविण्यासाठी, वेतनात वाढ व्हावी, यासाठी संशोधन केले जाते. खऱ्या संशोधनासाठी संबंधित व्यक्तीमध्ये अंत:प्रेरणा असणे गरजेचे आहे. संशोधन करण्याची मेथॉडालॉजी समाजसेवक डॉ. अभय बंग यांना कदाचित माहितही नसेल. त्यांनी कुपोषणावर केलेले संशोधन पीएचडीसाठी केलेले नाही. तरीही त्यांनी केलेल्या संशोधनाचा अभ्यास भारतातील हजारो विद्यार्थी करतात. संशोधनाच्या माध्यमातून युनो, केंद्र सरकारने काय करावे, याचे सल्ले आपण प्रबंधातून देतो. मात्र आपणच लिहिलेल्या संशोधनावर दोन मिनिटाचीही कृती आपण करू शकत नाही. केवळ पैशाच्या लोभाने केलेल्या संशोधनाचा फायदा समाजाला अजिबात होत नाही. सुशिक्षितांनी समाजाची फसवणूक केली तर त्याचे गंभीर परिणाम संपूर्ण समाजाला भोगावे लागतात. केवळ प्रबंधांचे पान भरण्यापेक्षा माणसाला माणूसपण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, संशोधनातून मानवी समाजाच्या अडचणी, त्यातील बदल व सरकारला मार्गदर्शक ठरतील, अशा उपाययोजना केल्या पाहिजेत, असे डॉ. अवसार म्हणाल्या.