एटापल्लीला पावसाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 01:02 IST2018-02-15T01:01:46+5:302018-02-15T01:02:47+5:30
मंगळवारी रात्रीच्या सुमारास एटापल्ली तालुक्यासह आरमोरी तालुक्याच्या मानापूर, देलनवाडी परिसरात अवकाळी वादळी पाऊस बरसला. या पावसामुळे रब्बी हंगामातील विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

एटापल्लीला पावसाचा फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली/मानापूर/देलनवाडी : मंगळवारी रात्रीच्या सुमारास एटापल्ली तालुक्यासह आरमोरी तालुक्याच्या मानापूर, देलनवाडी परिसरात अवकाळी वादळी पाऊस बरसला. या पावसामुळे रब्बी हंगामातील विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विशेष म्हणजे एटापल्ली तालुक्याच्या काही गावातील वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती आहे.
मंगळवारी एटापल्ली तालुक्यात एकूण ११.२ मिमी पाऊस बरसला. हाती येणाऱ्या हरभरा पिकाला या पावसाचा प्रचंड फटका बसला. भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान झाले. वादळामुळे अनेक ठिकाणचे खांब वाकले, तसेच काही ठिकाणच्या वीज तारा लोंबकळल्या. यामुळे महावितरण कंपनीला मोठा आर्थिक फटका बसला आहे. गट्टा भागात १८.२ मिमी, कसनसूर १६.२ मिमी, एटापल्ली शहरात ६.४ मिमी व जारावंडी भागात ४ मिमी पाऊस झाल्याची नोंद आपत्ती व्यवस्थापन कक्षाने घेतली आहे. सदर अवकाळी पावसामुळे कोणत्या गावात किती नुकसान झाले, याचा आकडा संबंधित यंत्रणेकडून अद्यापही मिळालेला नाही.
१२ व १३ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसाने मानापूर, देलनवाडी, भाकरोंडी परिसरातील रब्बी पिकांना प्रचंड फटका बसला. सोमवारी रात्री १० वाजतापासून अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे विटा व्यवसायीकांचे मोठे नुकसान झाले. भाजीपाला व रब्बी हंगामातील इतर पिकांचे नुकसान झाले.