पावसाचा कहर

By Admin | Updated: September 8, 2014 01:18 IST2014-09-08T01:18:08+5:302014-09-08T01:18:08+5:30

शनिवारच्या रात्रीपासून रविवारी दिवसभर पावसाने जिल्हाभरात कहर केला. संततधार पावसामुळे अहेरी व भामरागड तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क पुरामुळे तुटलेला आहे.

Rain erosion | पावसाचा कहर

पावसाचा कहर

शनिवारच्या रात्रीपासून रविवारी दिवसभर पावसाने जिल्हाभरात कहर केला. संततधार पावसामुळे अहेरी व भामरागड तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क पुरामुळे तुटलेला आहे. भामरागडच्या पर्लकोटा नदीला पूर आल्यामुळे पुराचे पाणी वस्तीत शिरले आहे. भामरागडमधील १५ दुकानांसह ११ कुटुंबाना सुरक्षीत स्थळी हलविण्यात आल्याची माहिती आहे. तसेच भामरागडमधील ७८ नागरिकांना प्रशासनाने सुरक्षीतस्थळी हलविले आहे. संततधार पावसामुळे गाढवी, खोब्रागडी, कठाणी, दिना नद्यांना तसेच लहान नाल्यांना पूर आला आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक मार्ग शनिवारच्या रात्रीपासून बंद झाले असून या मार्गावरील बसफेऱ्या तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुलचेरा तालुक्यात पुरामुळे हेटरकसा येथील १८ बकऱ्या व कोलेपल्ली येथील दोन बैल पुरात वाहून गेले आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या २४ तासात एकूण २ हजार ४८६ मिमी पाऊस झाला असून याची सरासरी २०७.१८ आहे. सर्वाधिक पाऊस अहेरी तालुक्यात ४४७.४ मिमी झाला आहे. एटापल्ली तालुक्यात २०५.२ भामरागड तालुक्यात २८९ मिमी, सिरोंचा तालुक्यात १७५.६ मिमी, कोरची तालुक्यात ७७.४ मिमी, कुरखेडा ५० मिमी, आरमोरी १०७ मिमी, देसाईगंज ११० मिमी, मुलचेरा तालुक्यात ४३५.६ मिमी, चामोर्शी तालुक्यात ३३२ मिमी, धानोरा तालुक्यात १०३ मिमी व गडचिरोली तालुक्यात १२७ मिमी पावसाची नोंद प्रशासनाने घेतली आहे. शनिवारच्या रात्रीपासून तर रविवारी दिवसभर संततधार पावसाने जिल्ह्याला अक्षरश: झोडपून काढले. यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूर परिस्थितीमुळे आष्टी-आलापल्ली, आलापल्ली-भामरागड, मुलचेरा-आष्टी, अंकिसा-आसरअल्ली, अहेरी-देवलमरी मार्ग बंद झाले आहेत. चामोर्शी तालुक्यातील सोनापूर नाल्याला पूर आल्यामुळे चामोर्शी-आष्टी मार्ग बंद झाला आहे. घोटनजीकच्या तुमडी नाल्याच्या पुलावर पाणी असल्यामुळे आलापल्ली-घोट मार्ग बंद झाला आहे.
कठाणी नदीला पूर आल्यामुळे सोडेनजीकच्या नाल्याच्या पुलावर पाणी चढले आहे. यामुळे धानोरा-गडचिरोली मार्ग बंद झाला आहे. रांगीनजीक मोहली व सोडे या गावाच्या दरम्यान झाड कोसळल्याने धानोरा-रांगी मार्ग बंद झाला आहे. एटापल्ली तालुक्यातील झुरी नाल्याच्या पुरावर चार फूट पाणी चढल्याने कसनसूर-एटापल्ली मार्ग तसेच जांभीया नाल्याला पूर असल्यामुळे गट्टा-एटापल्ली मार्ग बंद झाला आहे. एटापल्लीनजीकच्या राईसमीलजवळील नाल्याला पूर असल्यामुळे एटापल्ली-अहेरी, एटापल्ली-हेडरी मार्ग बंद झाला आहे. कोपरअल्लीनजीकच्या पुलावर ८ फूट पाणी असल्याने मुलचेरा-कोपरअल्ली मार्ग बंद झाला आहे. चौडमपल्ली नाल्यावर पूर आल्यामुळे आष्टी-लमाम मार्ग बंद झाला आहे. आंबटपल्ली व गोमणी नाल्याच्या पुलावर पाणी असल्याने सुंदरनगर-आलापल्ल्ली मार्ग बंद झाला आहे. जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात संततधार पावसाचा जोर कायमच आहे.
संततधार पावसामुळे मुलचेरा तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण होऊन हेटरकसा येथे १८ बकऱ्या व बोलेपल्ली येथे दोन बैल पुरात वाहून गेल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. पुरामुळे मुलचेरा-कोपरअल्ली मार्ग बंद झाल्यामुळे ६० ते ७० नागरिक अडकले असल्याची माहिती आहे. गोमणी नाल्याला पूर आल्यामुळे गोमणी गावातील १५ कुटुंबाना सुरक्षीतस्थळी हलविण्यात आले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Rain erosion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.