जिल्ह्यात पुन्हा सुरू होणार धान खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 05:01 IST2020-02-09T05:00:00+5:302020-02-09T05:01:02+5:30

शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात धान खरेदी झाल्यानंतर तो धान भरडाई करून साठवून ठेवण्यासाठी जिल्ह्यातील गोदामे कमी पडत आहेत. दरवर्षी इतर जिल्ह्यांना स्वस्त धान्य दुकानांमध्ये पुरवण्यासाठी गडचिरोलीतील तांदळाची मागणी होते.

Purchase of paddy resumes in the district | जिल्ह्यात पुन्हा सुरू होणार धान खरेदी

जिल्ह्यात पुन्हा सुरू होणार धान खरेदी

ठळक मुद्देशासनाचा आदेश प्राप्त । औरंगाबाद, सोलापूर जिल्ह्यांमध्ये जाणार गडचिरोलीचा तांदूळ

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात अतिरिक्त ठरणाऱ्या तांदळाचा पुरवठा औरंगाबाद आणि सोलापूर जिल्ह्यांना करण्याचा अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाचा आदेश प्राप्त झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यांत बहुतांश केंद्रांवर बंद असलेली धान खरेदी पुन्हा सुरू होणार आहे.
शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात धान खरेदी झाल्यानंतर तो धान भरडाई करून साठवून ठेवण्यासाठी जिल्ह्यातील गोदामे कमी पडत आहेत. दरवर्षी इतर जिल्ह्यांना स्वस्त धान्य दुकानांमध्ये पुरवण्यासाठी गडचिरोलीतील तांदळाची मागणी होते. मात्र यावर्षी कोणत्याही जिल्ह्याची मागणी शासनस्तरावरून झाली नसल्यामुळे अतिरिक्त ठरणाऱ्या धानाची भरडाई थांबली होती. परिणामी खरेदी केंद्रांवरील धानही ‘जैसे थे’ अवस्थेत असल्यामुळे शेतकऱ्याचा धान खरेदी करण्यास ब्रेक लागला होता. यामुळे शेतकऱ्याची मोठी अडचण झाली. पण आता हा तिढा दोन दिवसात सुटणार आहे.
यावर्षी आदिवासी विकास महामंडळाच्या ८९ आणि मार्केटिंग फेडरेशनच्या १७ अशा एकूण १०६ केंद्रांवरून शेतकºयांकडील धानाची खरेदी झाली. हमीभावानुसार आतापर्यंत १० लाख क्विंटलपेक्षा जास्त धानाची खरेदी करण्यात आला. परंतू प्रत्यक्षात भरडाई दिड लाख क्विंटलच्या घरात झाली आहे.
जिल्ह्यातील नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी स्वस्त धान्य दुकानांमधून फोर्टिफाईड तांदूळ देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी जिल्ह्यात महिन्याकाठी ३७ हजार क्विंटल एवढ्याच तांदळाची गरज असते. साध्या तांदळावर प्रक्रिया करून त्याला फोर्टिफाईड बनविण्यासाठी १० राईस मिलर्सना कंत्राट दिला आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यासाठी गरज असलेल्या तांदळाशिवाय अतिरिक्त धानाची भरडाई होत नसल्यामुळे समस्या निर्माण झाली होती.
आता दोन जिल्ह्यांची तांदळाची मागणी आल्यामुळे भरडाईसाठी जसजसा खरेदी केंद्रांवरील धान जाईल तसतसा शेतकऱ्याकडील धानाच्या खरेदीचा वेग वाढणार आहे.


सोलापूर आणि औरंगाबाद जिल्ह्यांची तांदळाची मागणी प्राप्त झाली आहे. दर महिन्याला त्यांना विशिष्ट क्विंटल तांदूळ उपलब्ध करून दिला जाईल. त्यामुळे जिल्ह्यात धान भरडाईला वेग येऊन खरेदी केंद्रही सुरळीत सुरू होतील.
- नरेंद्र भागडे,
जिल्हा पुरवठा अधिकारी, गडचिरोली

Web Title: Purchase of paddy resumes in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.