सुविधा पुरवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:09 IST2021-02-06T05:09:16+5:302021-02-06T05:09:16+5:30

विसोरा : बहुतांश नागरिकांकडे शौचालय आहे, मात्र ग्रामीण भागातील नागरिक शौचालयाचा वापरच करीत नाही. परिणामी शौचालय बेकामी झाले आहेत. ...

Provide facilities | सुविधा पुरवा

सुविधा पुरवा

विसोरा : बहुतांश नागरिकांकडे शौचालय आहे, मात्र ग्रामीण भागातील नागरिक शौचालयाचा वापरच करीत नाही. परिणामी शौचालय बेकामी झाले आहेत. शौचालयाचा वापर न झाल्याने हगणदारीमुक्त गाव निर्माण करणे अडचणीचे झाले आहे.

कैकाडी वस्तीत सुविधांचा अभाव

गडचिरोली : शहरालगत चामोर्शी मार्गावर कैकाडी समाजबांधवांची वस्ती आहे. या ठिकाणी अनेक झोपड्या आहेत. मात्र येथील नागरिक पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण आदी मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. कैकाडी वस्तीतील नागरिक प्रत्येक निवडणुकीत मतदान करतात, मात्र त्यांना नागरी सुविधा मिळत नाही.

अल्पवयीन चालकांवर कारवाई करा

आरमोरी : शहरातून मोठ्या प्रमाणात भरधाव वेगाने वाहने चालवली जात आहेत. मात्र याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे अपघातही घडत असून, अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

शहरातील नाल्यांची दुरुस्ती करा

गडचिरोली : शहरात अनेक नाल्यांच्या बाजूला असलेल्या रस्त्यांची वारंवार दुरुस्ती झाल्याने रस्ते उंच आणि नाल्या खाली गेल्या आहेत. शिवाय शहरातील रस्ते अरुंद असल्याने वाहने नालीत पडून अपघात होण्याची शक्यता आहे. या नाल्यांवर कोणतेही आच्छादन नसल्यानेही किरकोळ अपघात घडत आहे.

सिरोंचा तालुक्यातील बसथांब्याची दुरवस्था

सिरोंचा : अहेरी ते गडचिरोली आगारातून सिरोंचा तालुक्याच्या ग्रामीण भागात बसेस सोडल्या जातात. प्रवाशांच्या सोयीसाठी प्रवासी निवारे बांधण्यात आले आहेत. मात्र प्रवासी निवाऱ्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. अनेक प्रवासी निवाऱ्यांचे टीनपत्रे वादळाने उडाली आहेत. भिंती पिचकारीने रंगल्या असून घाणीचे साम्राज्य आहे.

अहेरी शहरातील अतिक्रमण काढा

अहेरी : शहरात रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. प्रशासनाने सदर अतिक्रमण तत्काळ काढावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. यापूर्वीही अनेकदा मागणी करण्यात आली, मात्र दुर्लक्षच झाले आहे. सातत्याने मागणी करूनही प्रशासनाकडून अतिक्रमणधारकांवर कारवाई होताना दिसून येत नाही.

अभयारण्यातील गावांचे पुनर्वसन रखडले

आष्टी : चामोर्शी तालुक्यातील आष्टी परिसरातील चपराळा अभयारण्यांतर्गत चपराळा व इतर लहान-मोठी चार ते पाच गावे येतात. या अभयारण्यातील पशूमुळे गावकऱ्यांना धोका आहे. आजपर्यंत वन्यपशूंचे अनेक हल्ले नागरिकांवर झाले आहेत. त्यामुळे या गावांचे पुनर्वसन करण्याची मागणी होत आहे.

ग्रामीण भागातील स्मशानभूमीची दुरवस्था

कुरखेडा : जि.प. प्रशासनामार्फत दहन व दफनभूमी बांधण्याची योजना गेल्या काही वर्षांपासून हाती घेण्यात आली असले तरी ग्रामीण भागातील अनेक गावांतील जुन्या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणचे दहन शेड मोडकळीस आले असून, स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्तादेखील नाही. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी अनेक अडचणी येतात.

पुलाचे बांधकाम करण्याची मागणी

झिंगानूर : झिंगानूर ते सिरकोंडा या मुख्य रस्त्यावर मामिडी तोगू नाला आहे. या नाल्यावर पूल बांधण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पूल नसल्याने पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक ठप्प राहते. त्यामुळे पुलाची निर्मिती होणे आवश्यक आहे.

भिवापूर-आमगाव मार्गाची दुर्दशा

चामोर्शी : तालुक्यातील भिवापूर क्रॉसिंग-आमगाव (महल)-नेताजीनगर हा १५ किमीचा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. डांबर निघून मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहनचालकांना या रस्त्यावरून वाहने चालविणे कठीण होत असल्याने मार्गाची दुरुस्ती करण्यात यावी.

भिकारमौशी मार्गाची दुरवस्था कायम

गडचिरोली : तालुक्यातील उसेगाव ते भिकारमौशी मार्गाची ठिकठिकाणी खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करताना नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावरून महामंडळाच्या अनेक बसेस आहेत. शालेय विद्यार्थी व नागरिकांना त्रास संकटाचा सामना करावा लागतो.

वसा येथील प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था

गडचिरोली : आरमोरी मार्गावर असलेल्या गडचिरोली तालुक्यातील वसा येथील प्रवासी निवाऱ्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या प्रवासी निवाऱ्याचे छत वादळामुळे पूर्णत: उडाले आहे. प्रवासी निवाऱ्याला वनस्पतींनी वेढा घातला असून, भिंतींना तडे गेले आहेत. त्यामुळे प्रवाशांना धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बायोगॅससाठी अनुदान वाढविण्याची मागणी

गडचिरोली : जिल्ह्यातील ९० टक्के कुटुंबांकडे पशुधन उपलब्ध आहे. त्यामुळे १०० टक्के अनुदानावर शासनाकडून बायोगॅस संयंत्र बांधून दिल्यास या कुटुंबांना बिनाखर्ची गॅसची सुविधा उपलब्ध होईल. ग्रामीण भागात आजही बऱ्याच प्रमाणात गोधन आहे. गोधनापासून मिळणाऱ्या शेणाचा योग्य उपयोग होण्यासाठी मागणी करणाऱ्या लाभार्थींना बायोगॅससाठी अनुदान वाढवून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

राजोलीत अर्धवट पुलावरून खडतर प्रवास

धानोरा : तालुक्यातील राजोली गावाजवळच्या कठाणी नदीवर पाच वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पूल दोन वर्षांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे रपट्यासह वाहून गेला. दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसांत या गावातील विद्यार्थी व नागरिकांना पुलाअभावी नवरगावमार्गे अधिकचे १५ किमी अंतर कापून धानोरा तालुका मुख्यालय व गडचिरोली मुख्यालय गाठावे लागते.

एटापल्ली तालुक्यातील सौरदिवे बंद

एटापल्ली : अतिदुर्गम भागात असलेल्या एटापल्ली तालुक्यातील आदिवासी गावात सौरदिवे लावण्यात आले. परंतु अनेक गावात लावण्यात आलेले सौरदिवे नादुरुस्त आहेत. सौरदिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्याने सौरदिवे निकामी झाले आहेत.

कोडसेपल्लीतील समस्या सोडवा

अहेरी : परिसरातील दुर्गम भागात वसलेल्या कोडसेपल्ली येथे अनेक समस्यांची भरमार आहे. गावात नाल्यांचा अभाव असल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडचण होत आहे. परिणामी जागोजागी सांडपाणी साचून दुर्गंधी पसरली आहे.

सिरोंचा तालुक्यातील रस्त्यांची दुरुस्ती करा

सिरोंचा : जिल्ह्यातील दुर्गम भागातील जवळपास ३०० गावांना पक्के रस्ते नाही. त्यामुळे या गावातील नागरिकांना पायवाटेचाच आधार घ्यावा लागत आहे. शासनाची सडक योजना दुर्गम गावापर्यंत अद्यापही पोहोचली नाही.

रेगडी येथे बँंक शाखा स्थापन करा

घोट : घोटपासून १५ किमी अंतरावर असलेल्या रेगडी येथे राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा स्थापना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. रेगडी परिसरात २५ ते ३० गावांचा समावेश आहे. शिवाय येथे पोलीस मदत केंद्र, शासकीय आश्रमशाळा, धर्मराव हायस्कूल, जि. प. उच्च प्राथमिक शाळा, शासकीय व निमशासकीय कार्यालये आहेत.

शाळेच्या आवारातील विद्युततारा हटवा

मुलचेरा : तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या इमारतीवरून गेलेल्या विद्युततारांमुळे विद्यार्थ्यांना धोका होऊ शकतो. या विद्युततारा काढण्याची मागणी होत आहे. विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका होऊ नये याकरिता तारा हटवाव्यात, अशी मागणी नागरिकांसह पालकांनी अनेकदा केली, मात्र याकडे महावितरणचे दुर्लक्ष होत आहे.

शेतकऱ्यांना लाख शेतीचे प्रशिक्षण द्या

धानोरा : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या माध्यमातून काही गावांमध्ये लाख शेतीचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देण्यात आले. परंतु ग्रामीण भागातील इतर शेतकऱ्यांना लाख शेतीचे प्रशिक्षण दिल्यास नवीन रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे लाख शेतीचे प्रशिक्षण द्यावे.

Web Title: Provide facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.