उष्माघातापासून स्वत:चा बचाव करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 05:00 AM2020-05-18T05:00:00+5:302020-05-18T05:00:52+5:30
मानवी शरीराचे तापमान १०६ अंश फॅरेनहाईट किंवा ४१ सेल्सिअस अंश इतके वाढते तेव्हा त्याला उष्माघात असे म्हणतात. उष्माघात हा सर्वात गंभीर प्रकार आहे आणि वैद्यकिय आणिबाणी मानले जाते. उष्माघात हा प्रामुख्याने ५० वर्ष वयोगटातील तसेच तरूण वयोगटातील व्यक्तींनादेखील होऊ शकतो. मानवी शरीराचे तापमान साधारणत: ३७ अंश सेल्सिअस किंवा ९८.६ अंश फॅरेनहाईट असते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्याचे तापमान ४२ सेल्सिअस अंशावर गेले असल्याने उष्माघात टाळण्यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर यांनी केले आहे.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरीराचे तापमान संतुलीत ठेवावे. मानवी शरीराचे तापमान १०६ अंश फॅरेनहाईट किंवा ४१ सेल्सिअस अंश इतके वाढते तेव्हा त्याला उष्माघात असे म्हणतात. उष्माघात हा सर्वात गंभीर प्रकार आहे आणि वैद्यकिय आणिबाणी मानले जाते. उष्माघात हा प्रामुख्याने ५० वर्ष वयोगटातील तसेच तरूण वयोगटातील व्यक्तींनादेखील होऊ शकतो. मानवी शरीराचे तापमान साधारणत: ३७ अंश सेल्सिअस किंवा ९८.६ अंश फॅरेनहाईट असते. मानवी शरीराच्या तापमान समतोल राखण्याची क्रिया संपुष्टात आल्यानंतर बेशुध्दावस्था येते. प्रसंगी रुग्णाचा मृत्यूदेखील होऊ शकतो. तिव्र तापमानामध्ये शरीराचे तापमान वाढते. डोकेदुखी, चक्कर येणे, कमजोरपणा वाटणे, हृदयाचे ठोके वाढणे, चिडचिड वाढणे, गोंधळल्यासारखे वाटणे, खुप तहाण लागणे, उष्णता असूनही घाम कमी येणे, उलट्या होणे आदी उष्माघाताची लक्षणे आहेत.
बाह्य उष्माघात व परंपरांगत उष्माघात असे उष्माघाताचे प्रकार आहेत. बाह्य उष्माघात हा खेळाडू, सैनिक, शेतात व उन्हात काम करणारे मजुर, दुचाकी प्रवास करणाऱ्यांना होऊ शकतो. तर वयोवृध्द, लठ्ठपणा, मधुमेह असणाऱ्यांना परंपरांगत उष्माघात होऊ शकतो, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रूडे यांनी सांगितले.
उष्माघातात अशी घ्या काळजी
उष्माघाताचा रुग्ण आढळल्यानंतर रुग्णास लगेच रुग्णालयात दाखल करावे. उष्माघाताच्या रुग्णाला सर्वप्रथम उष्णतेच्या ठिकाणापासून थंड ठिकाणी किंवा सावलीच्या जागेत हलवावे. रुग्णाचे डोके व पाठीचा भाग समांतरपेक्षा थोडा उंचावर असेल अशा स्थितीत ठेवाव. त्यानंतर डोक्यावर गार पाण्याच्या पट्ट्या किंवा बर्फाची पिशवी ठेवावी. यानंतर थोड्या-थोड्या अंतराने थंड पाणी पिण्यास द्यावे. दरम्यानच्या काळात गरम किंवा उत्तेजीत पदार्थ अजिबात देऊ नये. रुग्णाच्या संपूर्ण शरीरावर थंड पाण्याचे टॉवेल, बेडशिट, पांढरे कापड ठेवावे.
रुग्ण बेशुध्दावस्थेत असल्यास नजीकच्या रुग्णालयात दाखल करावे. रुग्णाचा मृत्यू टाळण्यासाठी व तात्काळ उपाययोजनेकरिता सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, आरोग्य पथक येथील वैद्यकिय अधिकाºयांनी व खाजगी रुग्णालयातील वैद्यकिय अधिकाºयांनी आपल्या रुग्णालयामध्ये आवश्यक ती पूर्व तयारी करुन ठेवावी. शितकक्ष, हवेशिर खोलीमध्ये पंखे, कुलर आदी वातानुकूलीत साहित्य उपलब्ध ठेवावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल जे.रुडे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शंशीकांत शंभरकर यांनी केले.