शेती व जोडव्यवसायातून साधली उन्नती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 05:00 IST2020-04-28T05:00:00+5:302020-04-28T05:00:59+5:30
विष्णूपद गाईन यांच्या कुटुंबाला शासनाने पाच एकर शेतजमीन दिली. त्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून विहिरींचे बांधकाम केले. जमीन मुरमाडी असल्याने आवश्यक प्रमाणात धानाचे उत्पादन होत नव्हते. त्यानंतर पाच एकर जमिनीचे दोन भाग करून २०१६-१७ मध्ये ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेतून दोन शेततळे खोदले. त्यात विहिरींचे पाणी साठविले. पीक कर्ज घेऊन ५० हजार रुपयांचे ६० हजार नग जरंग व राणी मच्छी टाकली.

शेती व जोडव्यवसायातून साधली उन्नती
भीमराव मेश्राम ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जोगीसाखरा : वाट्याला आलेल्या पाच एकर मुरमाळ शेतजमिनीत धान पिकत नव्हते. कुटुंबाची उपजीविका चालविताना अडचणी येत असतानाच कृषी विभागाच्या शेततळ्याच्या योजनेचा लाभ घेऊन त्यात मत्स्यपालन व शेतात मका व भाजीपाला पीक घेत शंकरनगर येथील शेतकरी विष्णूपद प्रभास गाईन हे वर्षाकाठी आठ लाखांचे उत्पादन घेत आहेत. शासकीय योजनेचा लाभ घेऊन दगडातून पाणी काढणाऱ्या शेतकऱ्याची आर्थिक उन्नतीकडे वाटचाल सुरू आहे.
विष्णूपद गाईन यांच्या कुटुंबाला शासनाने पाच एकर शेतजमीन दिली. त्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून विहिरींचे बांधकाम केले. जमीन मुरमाडी असल्याने आवश्यक प्रमाणात धानाचे उत्पादन होत नव्हते. त्यानंतर पाच एकर जमिनीचे दोन भाग करून २०१६-१७ मध्ये ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेतून दोन शेततळे खोदले. त्यात विहिरींचे पाणी साठविले. पीक कर्ज घेऊन ५० हजार रुपयांचे ६० हजार नग जरंग व राणी मच्छी टाकली. धानपिकाच्या शेतीला जोड व्यवसाय म्हणून दोन वर्षांपासून त्यांचा मत्स्य व्यवसाय सुरू आहे. यात त्यांना वर्षाकाठी चार लाख रुपये नफा मिळत आहे. तसेच मका, भाजीपाला पिकातून चार लाखांचे उत्पन्न ते घेत आहेत. वर्षाकाठी एकूण आठ लाख रुपयापर्यंतचा शुद्ध नफा त्यांना मिळत आहे. कुटुंबासह शेतात राबून ते कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही मार्गदर्शन घेतात. शेतकऱ्यांनी केवळ एका पिकावर अवलंबून न राहता जोडव्यवसाय करावा. नैसर्गिक संकटात एका पिकाला फटका बसला तरी दुसºया पिकातून नफा कमावता येतो, असे गाईन अन्य शेतकºयांना सांगतात.