दाखल्यांचे काम प्रगतीपथावर
By Admin | Updated: June 7, 2014 23:57 IST2014-06-07T23:57:13+5:302014-06-07T23:57:13+5:30
संग्राम केंद्राच्यावतीने सामान्य नागरिकांच्या उपयोगी पडणारे दाखले बनविण्याचे काम प्रगतीपथावर असून ६ जूनपर्यंत सुमारे १ लाख ४३ हजार ४५८ जन्माचे दाखले, ५६ हजार ६९३ मृत्यूचे दाखले

दाखल्यांचे काम प्रगतीपथावर
संग्राम केंद्र : १ लाख ४३ हजार ४५८ जन्माचे दाखले
गडचिरोली : संग्राम केंद्राच्यावतीने सामान्य नागरिकांच्या उपयोगी पडणारे दाखले बनविण्याचे काम प्रगतीपथावर असून ६ जूनपर्यंत सुमारे १ लाख ४३ हजार ४५८ जन्माचे दाखले, ५६ हजार ६९३ मृत्यूचे दाखले यांच्यासह इतरही १९ प्रकारचे दाखले बनविण्याचे काम प्रगतीपथावर असून येत्या १ महिन्यात संपूर्ण दाखले बनविण्यात येणार आहे. हे सर्व दाखले ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होणार असल्याने नागरिकांचा ग्रामपंचायत कार्यालयात हेलपाटे मारण्याचा त्रास वाचणार आहे.
देशातील संपूर्ण ग्रामपंचायतींची माहिती एका क्लिकवर केंद्र व राज्य शासनाला मिळावी यासाठी देशातील संपूर्ण ग्रामपंचायतीचा कारभार ऑनलाईन करण्याचे काम सुरू झाले आहे. हे काम करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींना संगणक परिचालक, संगणक, प्रिंटर, स्कॅनर उपलब्ध करून देण्यात आला आहे. ऑनलाईन करण्याच्या कामाला दोन वर्षाचा कालावधी पूर्ण होऊनही बहुतांश ग्रामपंचायतींचे काम ऑनलाईन झाले नव्हते. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाला योजनांची अंमलबजावणी करतांना फार मोठी अडचण निर्माण होत होती. दोन वर्षाचा विलंब अक्षम्य असल्याचे सांगून केंद्र शासनाने राज्य शासनाचे कान टोचले. त्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार ऑनलाईन करण्याच्या कामाला वेग आला आहे.
ज्या नागरिकांनी जन्माची नोंद ग्रामपंचायतमध्ये केली आहे, अशा सर्व नागरिकांचे दाखले बनविण्याचे काम सुरू झाले आहे. ६ जूनपर्यंत जिल्हाभरातील सुमारे १ लाख ४३ हजार ४५८ नागरिकांच्या जन्माचे दाखले बनविण्यात आले आहेत. यामध्ये अहेरी तालुक्यात १५ हजार ८८७, आरमोरी २३ हजार ९८७, भामरागड ४ हजार १0९, चामोर्शी १७ हजार ३७९, देसाईगंज २३ हजार ९४0, धानोरा १३ हजार २७७, एटापल्ली ८ हजार ७१६, गडचिरोली १0 हजार ३५२, कोरची ७ हजार १४६, कुरखेडा ८ हजार ७७२, मुलचेरा ६ हजार ६६२, सिरोंचा ३ हजार २३१ दाखले बनविण्यात आले आहेत. त्याचबरोबर ५६ हजार ६९३ मृत्यूचे दाखले, नमुना आठ ‘अ’ १ लाख ८0 हजार ९९, नमुना ‘१९’ ४ हजार ६0४, नमुना ‘९’ ५ हजार ८२२ व नमुना १६ चे ६४४ दाखले बनविण्यात आले आहेत.
सर्वसामान्य नागरिकांना नेहमी उपयोगी पडणारे १९ प्रकारचे दाखले बनविण्याचे काम सुरू आहे. आजपर्यंत हे काम अत्यंत संथगतीने सुरू होते. मात्र राज्य शासनाने सदर दाखले तत्काळ बनविण्याचे आदेश अधिकार्यांना दिल्याने सर्वच अधिकार्यांनी संगणक परिचालकांना तंबी देऊन तत्काळ दाखले बनविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे दाखले बनविण्याचे काम अत्यंत जलदगतीने सुरू आहे. पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी त्यांच्या क्षेत्रांतर्गत येणार्या संगणक परिचालक व ग्रामसेवकांच्या सभा घेत आहेत. हे काम तत्काळ होण्यासाठी महाऑनलाईनचे कर्मचारीही रात्रंदिवस काम करीत आहेत.
संग्राम केंद्रामध्ये सामान्य नागरिकांना अनेक सोयीसुविधा मिळणार असल्याने ग्रामीण भागाच्या विकासासाठी संग्राम केंद्र मैलाचा दगड ठरणार आहे. याच संग्राम केंद्रात मिनी बँकही सुरू केल्या जाणार आहेत. या बँकेत राष्ट्रीयकृत बँकेच्या सर्व सोयी-सुविधा मिळणार आहेत. ग्रामीण नागरिकांना तालुकास्थळी जाण्याचा त्रास वाचणार आहे. (नगर प्रतिनिधी)