जिमलगट्टा तालुक्याची निर्मिती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 22:42 IST2018-03-25T22:42:29+5:302018-03-25T22:42:29+5:30
अहेरी तालुका मुख्यालयापासून ६० किमी अंतरावर असलेल्या जिमलगट्टा तालुक्याची निर्मिती करावी, अशी मागणी मागील पंधरा वर्षांपासून शासनाकडे केली जात आहे.

जिमलगट्टा तालुक्याची निर्मिती करा
आॅनलाईन लोकमत
जिमलगट्टा : अहेरी तालुका मुख्यालयापासून ६० किमी अंतरावर असलेल्या जिमलगट्टा तालुक्याची निर्मिती करावी, अशी मागणी मागील पंधरा वर्षांपासून शासनाकडे केली जात आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्षच झाले. जिमलगट्टा परिसरातील नागरिकांना विविध शासकीय कामे करताना त्रास होत असल्याने या तालुक्याची निर्मिती करावी, अशी मागणी नागरिकांच्या वतीने जिल्हाधिकाºयांकडे करण्यात आली.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिमलगट्टाला भेट दिली असता, त्यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, जिमलगट्टा मंडळ कार्यालयांतर्गत जिमलगट्टा, वेडमपल्ली, उमानूर, मरपल्ली, रेगुलवाही, गोविंदगाव, किष्टापूर, देचली, पेठा, कोंजेड, रेनपल्ली, कमलापूर, राजाराम, खांदला, दामरंचा आदी ग्राम पंचायतीचा समावेश होतो.
या मंडळ कार्यालयांतर्गत ६७ गावांचा समावेश असून ४० ते ५० हजार लोकसंख्या आहे. लोवा, कल्लेड, आसली, मुखानपल्ली येथील नागरिकांना १० ते १५ किमीची पायपीट करून बस पकडावी लागते. तालुका स्तरावरील कामे करण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो. यात नागरिकांना आर्थिक, मानसिक त्रास होतो.
२००२ मध्ये जिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील चार नवीन तालुक्याच्या निर्मितीचा ठराव सादर करून त्यास मंजुरी प्रदान करण्यात आली. परंतु अद्यापही ही मागणी शासनस्तरावर प्रलंबित आहे.