कासवी परिसरातील समस्या सोडवा
By Admin | Updated: July 22, 2015 02:27 IST2015-07-22T02:27:01+5:302015-07-22T02:27:01+5:30
तालुक्यातील कासवी गावात व परिसरात विविध समस्या निर्माण झाल्या आहेत.

कासवी परिसरातील समस्या सोडवा
तहसीलदारांना निवेदन : कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा
आरमोरी : तालुक्यातील कासवी गावात व परिसरात विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत. कासवी परिसरातील समस्या तत्काळ सोडविण्यात याव्या, अशी मागणी कासवी ग्राम पंचायतीचे उपसरपंच प्रवीण रहाटे यांच्यासह ग्राम पंचायतीचे पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थांनी आरमोरीचे तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आरमोरी तालुक्यातील कासवी येथील तलाठी कार्यालय भाड्याच्या इमारतीत आहे. या इमारतीचे भाडे गेल्या १ वर्ष १० महिन्यांपासून थकीत आहे. त्यामुळे संबंधित घरमालकाला आर्थिक अडचण जाणवत आहे. कासवी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोटारपंपाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी त्रास होत आहे. खंडित वीज पुरवठ्यामुळे या भागातील लहान व्यवसायिक, कर्मचारी व नागरिकांना त्रास होत आहे. आरमोरी- देसाईगंज हा डांबरी मार्ग पूर्णत: उखडला असून अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. परिणामी या मार्गावर अपघात वाढले आहेत, असेही निवेदनात म्हटले आहे. समस्या मार्गी न लावल्यास आंदोलन करण्याचा इशारा कासवीचे उपसरपंच प्रवीण रहाटे, दिनेश आठोळे, कीर्तिलाल मेश्राम, संजय बांडे, आकाश दिघोरे यांनी दिला आहे. (वार्ताहर)