मुख्याध्यापक, लिपीक शिक्षकांचे दौरे झाले बंद
By Admin | Updated: October 16, 2014 23:23 IST2014-10-16T23:23:27+5:302014-10-16T23:23:27+5:30
विविध कार्यालयीन कामासाठी गडचिरोली प्रकल्पांतर्गत असलेल्या विविध आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, लिपीक व शिक्षक नेहमी गडचिरोली येथे प्रकल्प कार्यालयाला येत होते. यामुळे आश्रमशाळांच्या प्रशासकीय

मुख्याध्यापक, लिपीक शिक्षकांचे दौरे झाले बंद
नवीन टपाल सेवा कार्यान्वित : प्रकल्प अधिकाऱ्यांनी काढले परिपत्रक
दिलीप दहेलकर - गडचिरोली
विविध कार्यालयीन कामासाठी गडचिरोली प्रकल्पांतर्गत असलेल्या विविध आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, लिपीक व शिक्षक नेहमी गडचिरोली येथे प्रकल्प कार्यालयाला येत होते. यामुळे आश्रमशाळांच्या प्रशासकीय व शैक्षणिक कामात व्यत्यय येत होता. सदर बाब निर्दशनास आल्यामुळे प्रकल्प अधिकारी पी. शिवशंकर यांनी ४ आॅक्टोबर २०१४ रोजी नवे परिपत्रक काढून टपाल सेवा कार्यान्वित केली आहे. या सेवेअंतर्गत आश्रमशाळा परिसरातील ८ केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारचा नवा उपक्रम हाती घेतल्यामुळे आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, लिपीक तसेच शिक्षक आणि वसतीगृहातील कर्मचाऱ्यांचे दौरे बंद झाले आहेत. या टपाल सेवेमुळे पैसा व वेळेची बचतही झाली आहे.
प्रकल्प अधिकाऱ्यांनी काढलेल्या ४ आॅक्टोबरच्या परिपत्रकात टपाल सेवेची संपूर्ण माहिती आहे. गडचिरोली प्रकल्पाच्या अधिनस्त सर्व कार्यालयाने निश्चित केलेल्या विवरण पत्रानुसार नेमलेल्या शाळा, वसतीगृहाजवळचे मुख्य ठिकाणाहून अधिनस्त शाळा तसेच वसतीगृहाने प्रकल्प कार्यालयास पाठवावयाचे ठपाल केंद्रवर्ती ठिकाणच्या शाळा तसेच वसतीगृहांकडे दर बुधवारला टपाल पोच करून त्यांच्या मार्फतीने टपाल प्रकल्प कार्यालयास पाठवावे. तसेच मुख्य ठिकाण नेमलेल्या शाळा तसेच वसतीगृहांच्या अधिनस्त कार्यालयाची प्राप्त सर्व टपाल प्रकल्प कार्यालयास पोच करण्याकरीता व अंतर्गत कार्यालयाचे प्रकल्प कार्यालय स्तरावरील टपाल स्वीकारावी, असेही या परिपत्रकात नमुद आहे. बुधवारला सुट्टी असल्यास सदर टपाल व्यवस्थेचे काम गुरूवारला करावे, असेही या परिपत्रकात नमुद आहे. मुख्य ठिकाण नेमले असलेल्या कार्यालयाने उचित कामासाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांचे नाव व त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक कार्यालयास तीन दिवसांच्या आत कार्यालयास सादर करावा, असेही या परिपत्रकात नमुद आहे. संबंधित नेमलेल्या कर्मचाऱ्याने टपाल पोच व टपालची उचल केल्यानंतर स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. व प्रकल्प कार्यालयातील हालचाल रजिस्टरमध्ये संबंधित कर्मचाऱ्याने उपस्थित झाल्याबाबतची स्वाक्षरी करणे आवश्यक असल्याचे प्रकल्प अधिकाऱ्यांनी परिपत्रकात म्हटले आहे.
प्रकल्प अधिकारी पी. शिवशंकर यांनी या नवीन टपाल सेवेसाठी ८ मध्यवर्ती केंद्र निश्चित केले आहेत. यात शासकीय आश्रमशाळा कोरची, आदिवासी मुलांचे वसतीगृह कुरखेडा, मुलांचे वसतीगृह देसाईगंज, मुलांचे वसतीगृह आरमोरी, मुलांचे वसतीगृह धानोरा, मुलांचे वसतीगृह चामोर्शी, मुलांचे वसतीगृह चातगाव व प्रकल्प कार्यालय गडचिरोली आदींचा समावेश आहे. कोरची शासकीय आश्रमशाळा या मध्यवर्ती केंद्रांमध्ये मसेली, ग्यारापत्ती, कोटगुल आदी आश्रमशाळा तसेच मुला- मुलींचे वसतीगृह कोरची आदींनी टपाल स्वीकारावी तसेच पोहोचवावी अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
आदिवासी मुलांचे वसतीगृह कुरखेडा या मध्यवर्ती केंद्र ठिकाणी रामगड, अंगारा, घाटी, सोनसरी, येंगलखेडा आदी आश्रमशाळा तसेच कुरखेडा येथील मुलींचे वसतीगृह व मुलांचे वसतीगृह मालेवाडा येथील कर्मचाऱ्यांनी कुरखेडा येथे येऊन टपाल स्वीकारावी तसेच प्रकल्प कार्यालयाला पाठवावयाची टपाल पोहोचवावी अशी व्यवस्था करण्यात आली आहे. अशाच प्रकारे अन्य ६ मध्यवर्ती केंद्र ठिकाणी त्या- त्या परिसरातील शासकीय आश्रमशाळा व वसतीगृहातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या शाळांकडे प्रकल्प कार्यालयाने पाठविलेली टपाल स्वीकारावी तसेच प्रकल्प कार्यालयाला पाठवावयाची टपाल केंद्रस्थळी पोहोचवावी अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
या नव्या टपाल व्यवस्थेमुळे दुर्गम भागातील लांब अंतरावर असलेल्या शासकीय आश्रमशाळा व वसतीगृहातील कर्मचाऱ्यांना गडचिरोली येथे प्रकल्प कार्यालयाला येणे आवश्यक नाही. यामुळे आश्रमशाळा व वसतीगृहातील कर्मचाऱ्यांचा आर्थिक खर्च व वेळेची बचत झाली आहे. यापूर्वी गडचिरोली प्रकल्पातील अनेक शासकीय आश्रमशाळा व वसतीगृहांचे कर्मचारी टपाल देण्याच्या उद्देशाने गडचिरोली येथे प्रकल्प कार्यालयाला वारंवार येत होते. यामुळे प्रकल्प कार्यालयात कर्मचाऱ्यांची गर्दी दिसून येत होती. मात्र आता ही गर्दी ओसरली आहे.