ग्रामीण भागातील वीज खांब धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:42 IST2021-08-17T04:42:30+5:302021-08-17T04:42:30+5:30

अहेरी : अहेरी तालुक्यासह जिल्हाभरात अनेक गावांत अनेक ठिकाणी वाकलेले खांब असून, ताराही लोंबकळत आहेत. त्यामुळे धोका होण्याची शक्यता ...

Power poles in rural areas are dangerous | ग्रामीण भागातील वीज खांब धोकादायक

ग्रामीण भागातील वीज खांब धोकादायक

अहेरी : अहेरी तालुक्यासह जिल्हाभरात अनेक गावांत अनेक ठिकाणी वाकलेले खांब असून, ताराही लोंबकळत आहेत. त्यामुळे धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. त्यामुळे वाकलेले वीज खांब व लोंबकळलेल्या तारा सुरळीत कराव्यात, अशी मागणी होत आहे.

परवाना शिबिराचे आयोजन करावे

काेरची : तालुक्यात दिवसेंदिवस वाहनधारकांची संख्या वाढत आहे. मात्र, अनेकांजवळ वाहन चालविण्याचा परवाना नाही. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने तालुक्याच्या ठिकाणी ठरावीक दिवशी शिबिर आयोजित केले जाते. मात्र, कोरोनामुळे अशा शिबिराचे आयोजन बंद केले आहे.

जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी

आलापल्ली : मोकाट जनावरांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यावर ही जनावरे उभी राहत असल्याने मार्ग काढण्यास अडचणी येतात. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला. मोकाट कुत्रे दुचाकीस्वारांच्या मागे धावतात. त्यामुळे या जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

व्यावसायिकांमुळे वाहतुकीला अडथळा

गडचिरोली : येथील इंदिरा गांधी चौकात मुख्य मार्गाच्या कडेला अनेक किरकोळ दुकानदार दिवसभर हातगाडी लावून विविध साहित्य विकत असतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. गांधी चाैकात सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास दुचाकी व हातठेल्यांची गर्दी असते. पालिका प्रशासन कारवाईबाबत सुस्त असल्याचे दिसून येते.

खांब गाडणाऱ्यांवर कारवाई करा

गडचिरोली : शहरातील मुख्य मार्गावर, तसेच अंतर्गत मार्गावर काही नागरिक फलक लावण्यासाठी मार्गावर खड्डा खोदतात. नंतर खड्डा तसाच ठेवला जातो. परिणामी, अपघात होण्याची शक्यता आहे. अमिर्झा परिसरात अनेक गावांमध्ये रस्त्यावर जुने वीज खांब आले आहेत. काही ठिकाणी नव्याने रस्ते झाले. मात्र, खांबांची जागा बदलली नाही.

वर्दळीच्या रस्त्यावर वाढले अतिक्रमण

गडचिराेली : शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण वाढत आहे. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. कोरोनानंतर प्रशासनाने शिथिलता दिल्याने वाहने रस्त्यावर धावत आहेत, परंतु रस्त्याच्या कडेला काही व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. मुख्य बाजारपेठेत रस्त्याच्या दाेन्ही बाजूला दुकानदारांनी अतिक्रमण वाढविले आहे. गेटच्या बाहेर साहित्य ठेवतात.

सीमावर्ती भागातील गावे दुर्लक्षितच

गडचिरोली : छत्तीसगड, आंध्र प्रदेश राज्यांच्या सीमेला लागून असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या चार तालुक्यांतील औद्योगिक विकासाकडे राज्य सरकारचे कायम दुर्लक्ष झाले आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांत जिल्ह्यात एकही मोठा उद्योग निर्माण न झाल्याने बेरोजगारी वाढली आहे. या भागात वीज, पाणी, आरोग्य यासह विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. दुर्गम भागातील अनेक गावे विकासापासून काेसाे दूर असल्याचे दिसून येते.

रिक्त पदांमुळे विविध योजना कागदावरच

गडचिराेली : पशुधन विकासाला चालना देण्यासाठी शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. मात्र, तालुक्यात पशुसंवर्धन विभागात अनेक पदे रिक्त असल्याने विकासाच्या योजना पशुपालक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. पंचायत समितीने सुधारित आकृतिबंधानुसार अनेक पदांना मंजुरी दिली आहे, पण पदे भरली नाहीत. त्यामुळे योजना कागदावरच राहिल्याचा आरोप गावकरी करीत आहेत.

तालुक्यात स्वच्छता मोहिमेचा बोजवारा

चामाेर्शी : तालुक्यातील अनेक गावांमध्ये नियमित स्वच्छता होत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे स्वच्छतेकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. देशात सगळीकडे स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र, काही नागरिकांमुळे अभियानाचा बोजवारा उडत आहे. मागणी करूनही प्रशासनही याकडे दुर्लक्ष करीत आहे. स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याची गरज आहे. ग्रामपंचायत प्रशासनाचा पुढाकार महत्त्वाचा आहे.

सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे बांधा

आरमोरी : शहरात सार्वजनिक मूत्रिघर नसल्याने, जनतेने स्वत:हून काही ठिकाणी अघोषित मूत्रिघरे तयार केली आहेत. त्यामुळे जवळपासचे दुकानदार व घरमालक कमालीचे त्रस्त आहेत. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे बांधणे आवश्यक आहे. अनेक दिवसांपासून ही मागणी केली जात आहे, परंतु या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. सातत्याने मागणी करूनही प्रशासनाने आवश्यक त्या ठिकाणी स्वच्छतागृहे निर्माण केली नाहीत.

अंकिसा मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य

अंकिसा : सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथील मुख्य मार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. या मार्गावरून आसरअल्ली दरम्यानच्या गावातील नागरिक ये-जा करत असल्याने या मार्गावरून वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. त्यामुळे या मार्गाची बांधकाम विभागाने दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title: Power poles in rural areas are dangerous