कृषिपंपाची वीज जोडणी नादुरूस्त
By Admin | Updated: October 11, 2014 23:09 IST2014-10-11T23:09:05+5:302014-10-11T23:09:05+5:30
यंदाच्या पूर परिस्थितीमुळे मालेवाडा- सिंदेवाही- चरवीदंड अशी कृषी पंपाची वीज वाहीनी प्रशासनाच्यावतीने जोडण्यात आली होती. मात्र यंदा झालेल्या पूर परिस्थितीमुळे या वीज वाहिनीतील खांब

कृषिपंपाची वीज जोडणी नादुरूस्त
मालेवाडा : यंदाच्या पूर परिस्थितीमुळे मालेवाडा- सिंदेवाही- चरवीदंड अशी कृषी पंपाची वीज वाहीनी प्रशासनाच्यावतीने जोडण्यात आली होती. मात्र यंदा झालेल्या पूर परिस्थितीमुळे या वीज वाहिनीतील खांब मोडून पडले आहेत. तर काही खांब पूरात वाहून गेले. या ठिकाणी तुटलेले खांबही शिल्लक राहिले नसल्यामुळे तात्पूरती दुरूस्तीही अशक्य आहे. पुरामुळे ही कृषी पंपाची वीज वाहीनी पूर्णत: क्षतीग्रस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांना धानपिकाला पाणी देण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. परिणामी मालेवाडा परिसरातील शेतकरी संकटात सापडले आहेत.
गतवर्षी मालेवाडा परिसरासह संपूर्ण जिल्हाभरात संततधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. शेकडो हेक्टर शेतीतील धानपिक पुरात वाहून गेले होते. अनेक घरांची पडझडही झाली होती. मालेवाडा परिसरात अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. मालेवाडा- सिंदेवाही- चरवीदंड ही कृषी पंपाची वीज वाहिनी गतवर्षी पुरामध्ये वाहून गेली होती. यामुळे शेतकऱ्यांपुढे सिंचनाची मोठी समस्या निर्माण झाली असल्याची बाब महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या मालेवाडा परिसरातील पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या लक्षात आणून दिली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी या समस्येची दखल घेऊन या कृषी वीज वाहीनीची तात्पूरती पुन्हा जोडणी केली होती. या कृषी वीज वाहिनीच्या दुरूस्तीसाठी कंत्राटदार मिळत नव्हता. यामध्ये चार महिने लोटून गेले. त्यानंतर मालेवाडा परिसरातील शेतकऱ्यांनी सध्या श्रमदानातून तुटलेले खांब परिसरातून गोळा करून ही कृषी वीज वाहिनी उभी केली होती. मात्र यावर्षीच्या पावसाळ्यात पुरामुळे पुन्हा ही कृषी वीज वाहिनी पूर्णत: क्षतिग्रस्त झाली आहे.
सदर कृषी वीज वाहीनीची दुरूस्ती करून शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळाली नाही तर शेतकऱ्यांच्या तोंडापुढे आलेला घास हिरावल्या जाणार आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. (वार्ताहर)