विसोरा-शंकरपूर मार्गावर खड्डे
By Admin | Updated: September 8, 2014 01:22 IST2014-09-08T01:22:50+5:302014-09-08T01:22:50+5:30
संततधार पावसामुळे देसाईगंज तालुक्यातील विसोरा-शंकरपूर या मार्गावर मोठे खड्डे पडले असून पाणी साचले आहे.

विसोरा-शंकरपूर मार्गावर खड्डे
विसोरा : संततधार पावसामुळे देसाईगंज तालुक्यातील विसोरा-शंकरपूर या मार्गावर मोठे खड्डे पडले असून पाणी साचले आहे. या मार्गाची पूर्णत: दुरास्था झाल्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गाच्या दुरूस्तीकडे प्रशासन अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप या भागातील नागरिकांनी केला आहे.
गेल्या तीन वर्षांपासून विसोरा ते शंकरपूर दरम्यान वाहणाऱ्या जिल्ह्यातील प्रमुख नद्यांपैकी एक असलेल्या गाढवी नदीवरील उंच पुलाचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे. मात्र सध्या पावसामुळे सदर मार्गाचे काम तात्पुरते बंद करण्यात आले आहे. या मार्गाच्या कामासाठी संबंधीत विभागाने नदी पुलापासून विसोराकडे जाणाऱ्या अर्धा किमीपर्यंत तर शंकरपूरकडे जाणाऱ्या शंकरपूर गावापर्यंतच्या रस्त्यावर रस्ता उंच करण्यासाठी माती, काळी गिट्टी यांचा भरणा केला आहे. परंतु या मार्गावरून दुचाकी, हलक्या व जड चारचाकी वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. पावसामुळे दोन किमी अंतराच्या रस्त्यावर जागोजागी खड्डेच खड्डे पडले आहेत. तर खड्ड्यातील काळी गिट्टी बाहेर पडल्याने शाळेत सायकलने जाणाऱ्या मुला-मुलींना तसेच दुचाकी, चारचाकी वाहनधारकांना प्रचंड शारीरिक, मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने ठोस पावले उचलून या मार्गाची तत्काळ दुरूस्ती करावी, अशी मागणी विसोरा, शंकरपूर परिसरातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)