सिरोंचातील जैवविविधता उद्यानाची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 05:01 IST2020-06-26T05:00:00+5:302020-06-26T05:01:11+5:30
सदर वनोद्यानात लहान मुलांसाठी खेळणी, झुले, घसरपट्टी, ट्री-होम आदींची व्यवस्था करण्यात आली. बसण्यासाठी बैलबंडीच्या चाकाच्या सहाय्याने पिरॅमिड्स बनविण्यात आले. नागरिकांना बसण्यासाठी छोट्या-छोट्या गवतांच्या कुटी बनविण्यात आल्या. भव्य व प्रशस्त असलेल्या या जैवविविधता उद्यानात सिरोंचा शहरासह तालुक्यातील बरेच लोक फिरायला येत होते.

सिरोंचातील जैवविविधता उद्यानाची दुरवस्था
कौसर खान ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : वनविभागाच्या वतीने सिरोंचा शहरालगत निजामाबाद-जगदलपूरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगत मोठ्या स्वरूपाचे जैवविविधता उद्यान उभारण्यात आले. लाखो रुपयांच्या खर्चातून येथे विविध प्रकारची झाडे तसेच वनौषधींचे रोपटे लावण्यात आले. शिवाय नागरिक व बालकांसाठी विविध प्रकारची खेळणी व साहित्य बसविण्यात आले. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या जैवविविधता उद्यानाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. हे उद्यान आता शेवटच्या घटका मोजत आहेत.
सदर वनोद्यानात लहान मुलांसाठी खेळणी, झुले, घसरपट्टी, ट्री-होम आदींची व्यवस्था करण्यात आली. बसण्यासाठी बैलबंडीच्या चाकाच्या सहाय्याने पिरॅमिड्स बनविण्यात आले. नागरिकांना बसण्यासाठी छोट्या-छोट्या गवतांच्या कुटी बनविण्यात आल्या. भव्य व प्रशस्त असलेल्या या जैवविविधता उद्यानात सिरोंचा शहरासह तालुक्यातील बरेच लोक फिरायला येत होते. मात्र वनविभागाचे सदर वनोद्यानाच्या देखभालीकडे प्रचंड दुर्लक्ष झाल्याचे या वनोद्यानाच्या स्थितीवरून दिसून येते. नागरिकांसाठी बनविण्यात आलेल्या गवतांच्या कुटी जीर्ण अवस्थेत आहेत. बैलबंडीच्या पिरॅमिडला उधळी लागली असून ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. येथे अनेक झुले लावण्यात आले होते. मात्र या झुल्याचे केवळ स्टॅड उरले आहेत. मुख्य भाग व झुले गायब झाले आहेत. खेळणी फुटून खाली पडल्या आहेत. ट्रि होमची दुरस्था झाली असून सदर उद्यानातील हिरवेगार गवत आता दिसेनासे झाले आहे. हे गवत सुकून पडले असून केवळ पानांचा सडा दिसत आहे. सदर उद्यानातील वनौषधींची झाडेही नामशेष झाली असून झाडासमोर लावलेले फलक तेवढे शिल्लक आहेत.
विकासाबाबत वनाधिकारी उदासीन?
गडचिरोली जिल्ह्यात ७६ टक्के जंगल असून सर्वाधिक जंगल अहेरी उपविभागात आहे. आलापल्ली व सिरोंचा या दोन विभागातील जंगलात मौल्यवान सागवान झाडे आहेत. जंगलावर विविध प्रक्रिया उद्योग निर्माण केल्यास या भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. यासाठी शासनासह वनाधिकाऱ्यांची मानसिकता सकारात्मक असणे गरजेचे आहे. मात्र सिरोंचा तालुक्यासह अहेरी उपविभागातील अनेक वन अधिकारी काही प्रमाणात उदासीन असल्याचे दिसून येतात. सिरोंचा वनविभागाच्या वतीने लाखो रुपये खर्च करून बनविलेल्या जैवविविधता उद्यानाची देखभाल, संरक्षण करण्याकडे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. सदर वनोद्यानाला आणखी विकसित करण्यासाठी आजपर्यंतच्या वनाधिकाºयांकडून कोणतेही ठोस नियोजन व प्रयत्न झाल्याचे दिसून येत नाही.