काव्यातून समाज जीवनाचे वास्तव उलगडले
By Admin | Updated: October 27, 2016 01:43 IST2016-10-27T01:43:54+5:302016-10-27T01:43:54+5:30
नक्षत्राचे देणं काव्यमंच पुणे, झाडी बोली साहित्य मंडळ व अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळ मुख्य शाखा गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने

काव्यातून समाज जीवनाचे वास्तव उलगडले
३० कवींचा सहभाग : राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त कवी संमेलन
गडचिरोली : नक्षत्राचे देणं काव्यमंच पुणे, झाडी बोली साहित्य मंडळ व अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळ मुख्य शाखा गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने शाखेच्या सामुदायिक प्रार्थना मंदिरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त सोमवारी विदर्भस्तरीय कवी संमेलन घेण्यात आले. या संमेलनात विदर्भातील ३० कवींनी सहभाग नोंदवून आपल्या काव्यातून समाज जीवनाचे वास्तव मांडले.
कवी संमेलन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य खंजेरीकार बंडोपंत बोढेकर होते. उद्घाटन झाडीपट्टीच्या बहिणाबाई अंजना खुणे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भूवैकूंठ अड्याळ टेकडीचे अध्यक्ष डॉ. नवलाजी मुळे, गुरूदेव सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे, दलित मित्र नानाजी वाढई, पंडित पुडके, आत्माराम आंबोरकर आदी मान्यवर उपस्थित होते. या कवी संमेलनात चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा जिल्ह्यातील ३० कवींनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला. राष्ट्रसंत वंदना गायनाने संमेलनाची सुरुवात झाली. सुरेंद्र इंगळे यांनी ‘शेतकऱ्यांची आत्महत्या’, संगीता धोटे यांनी ‘तुलाच विचारते आई’, खुशालदास कामडी यांनी ‘हुंड्याची करामत’, रमेश भोयर यांनी ‘भिजली आहे धरती’, शालिक दानव यांनी ‘दुष्काळ’ नावाची कविता सादर केली. क्षितीज शिवरकर यांनी ‘तुझी लेक’, माधव कौरासे यांनी ‘पावर’, अमोल मोरे यांनी ‘जगावं तर कसं, मराव तर कसं’, ईश्वर मत्ते यांनी ‘जगणे आजच, उद्या काय रे...’, महादेव हुलके यांनी ‘शेतकऱ्यांची व्यथा’, सतीश लोंढे यांनी ‘राष्ट्रसंत तुकडोजी’, नरहरी रामटेके यांनी ‘पटलं तर घ्या’, वंदना तिवारी यांनी ‘मॉ’, सिद्धार्थ वालदे यांनी ‘काय करेल दैव गती’, पांडुरंग नंदागवडी यांनी ‘सैनिक भाऊ माझा’, एकनाथ बुद्धे यांनी ‘उरी हल्ला’, वसंत कुलसंगे यांनी ‘स्वातंत्र संग्राम’, मधुकर जंबेवार यांनी ‘स्वर्गाचे द्वार’, जयंत येलमुले यांनी ‘संदर्भ’, मुरलीधर बद्दलवार यांनी ‘जंगल माझं गाव’, डॉ. चंद्रकांत लेनगुरे यांनी ‘बापू’, देवराव भोगेवार यांनी ‘मॉ-बाप’, अनिल पिट्टलवार यांनी ‘राष्ट्रसंत’, सूरज गोरंतवार यांनी ‘अर्ज’, गुलाब मुळे यांनी ‘इन्कलाबी घाव झाले’ ही कविता सादर केली.
चेतन ठाकरे यांनी ‘पूर्वीची माणसं जितकी खरी होती, तितकाच पाऊस सुद्धा खरा होता’ या आशयाची कविता सादर केली. अंजनाबाई खुणे यांनी आपल्या रंगततदार शैैलीत ‘एक तरी झाड लावा व वृद्धाची व्यथा ही वास्तववादी कविता सादर केली. बंडोपंत बोढेकर यांनी ‘गांधीगिरी’ कवितेतून महात्मा गांधींचा त्याग प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभा केला. सहभागी सर्वच कवींना ग्रामगीता व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन चेतन ठाकरे यांनी केले. यशस्वीतेसाठी राहूल आंबोरकर, भोगेवार, निकुरे, वेठे व गुरूदेव भक्तांनी सहकार्य केले.