आरमोरीत पुरेसा पाणीपुरवठा द्यावा
By Admin | Updated: June 20, 2015 02:18 IST2015-06-20T02:18:05+5:302015-06-20T02:18:05+5:30
आरमोरी शहरात पाणीपुरवठ्यासह विजेची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.

आरमोरीत पुरेसा पाणीपुरवठा द्यावा
वीज समस्या सोडवा : नगर पंचायतीच्या प्रशासकांना निवेदन
आरमोरी : आरमोरी शहरात पाणीपुरवठ्यासह विजेची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. सदर समस्या नगर पंचायतीच्या प्रशासकांनी सोडवाव्यात, अशी मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
मागील एक महिन्यापासून आरमोरी तालुक्यात सातत्याने विजेचा लंपडाव चालू आहे. त्यामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. एकदा विद्युत पुरवठा खंडीत झाल्यानंतर सहा ते सात तास पूर्ववत होत नाही. आरमोरी शहराला चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. गाढवी नदीवरील पाणी गढूळ असल्यामुळे ही पाणीपुरवठा योजना बंद ठेवण्यात आली आहे. केवळ वैनगंगा नदीवर अस्तित्त्वात असलेल्या पाणीपुरवठा योजनेवरून ३० हजार नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. ही समस्या लक्षात आणून दिली. त्याचबरोबर पथदिवे, शहरातील अतिक्रमण सोडविण्यात यावे, अशीही मागणी केली.
आरमोरी शहरातील नाल्यांचा वेळोवेळी उपसा केला जात नाही. त्यामुळे अनेक नाल्या कचऱ्याने तुंबल्या आहेत. त्याचबरोबर रस्त्यावरील कचऱ्याचीही विल्हेवाट लावली जात नाही. पावसाळ्यात ही समस्या गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या समस्या सोडविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष भारत बावनथडे, ज्ञानेश्वर ढवगाये, पंकज खरवडे, गणेश बैरवार, वेणू ढवगाये, नंदू नाकतोडे, राजू कंकटवार, महेंद्र शेंडे, रोहीत धकाते, गोलू वाघरे, अंकुश खरवडे, चंदू आकरे, सचिन बेहरे, सूरज हेमके, स्वप्नील धात्रक, संजय सोनटक्के, संगीता रेवतकर, रोशनी बैस, युगल सामृतवार उपस्थित होते.