धोडराज मार्गावर खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:16 IST2021-05-04T04:16:32+5:302021-05-04T04:16:32+5:30

भामरागड : भामरागडवरून धोडराज पाच किलोमीटर अंतरावर आहे. या मार्गावर खड्डे पडले आहेत. मागील सात वर्षांपासून या मार्गाची दुरुस्तीच ...

Pits on Dhodraj Marg | धोडराज मार्गावर खड्डे

धोडराज मार्गावर खड्डे

भामरागड : भामरागडवरून धोडराज पाच किलोमीटर अंतरावर आहे. या मार्गावर खड्डे पडले आहेत. मागील सात वर्षांपासून या मार्गाची दुरुस्तीच करण्यात आलेली नाही. धोडराजवासीय भामरागड येथे शासकीय कामानिमित्त येतात. त्यांना या खराब झालेल्या रस्त्यावरुनच यावे लागते.

कव्हरेज खंडित

धानोरा : तालुक्यातील चातगाव येथील मोबाईल टॉवर व्यवस्थित काम करत नसल्याने कव्हरेज मिळत नाही. त्यामुळे चातगाव परिसरातील मोबाईलधारक त्रस्त झाले असून, टॉवर दुरुस्त करण्याची मागणी होत आहे. येथील टाॅवरच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

अपंग विवाह अनुदान योजनेबाबत अनभिज्ञता

कुरुड : शासनातर्फे अपंग युवक-युवतींसाठी कल्याण विवाह अनुदान योजना राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत अपंग कल्याण विवाह योजना राबवली जाते. मात्र, या योजनेबाबत जनजागृती हाेत नाही.

कोरची शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला

कोरची : शहरातील विविध प्रभागांमध्ये अनेक नाल्या तुंबल्याने परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आजारी लोकांची संख्याही वाढत आहे.

सुबाभूळ लागवडीसाठी अनुदान द्या

धानोरा : सुबाभूळ लागवडीकरिता शेतकऱ्यांना कृषी व वन विभागाने अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सुबाभूळ लागवडीतून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ होतो. यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी होत आहे.

वाहतुकीला अडसर

कुरखेडा : कुरखेडा शहराच्या अनेक प्रभागांमधील अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले आहेत. वारंवार मागणी करूनही नगर पंचायत प्रशासन रस्ता दुरुस्तीच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

पशू विभागातील पदे रिक्त

एटापल्ली : पशुवैद्यकीय विभागात अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे जनावरांवर वेळीच उपचार होण्यास अडथळा निर्माण होत आहे. अनेक पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये कर्मचारी उपलब्ध नसल्याने शिपाईच कारभार सांभाळत आहेत. त्यामुळे पशू विभागातील रिक्त पदे लवकर भरावीत, अशी मागणी हाेत आहे.

थ्री-जी सेवा नावापुरतीच

कुरुड : परिसरात बीएसएनएलकडून थ्री-जी सेवा देण्यात आली आहे. मात्र, ही थ्री-जी सेवा केवळ नावापुरतीच असल्याचे दिसून येत आहे. याठिकाणी बीएसएनएलचे इंटरनेट स्पीड टू-जी सेवेप्रमाणे मिळत आहे. नागरिकांकडून थ्री-जी सेवेचे पैसे घेतले जात असून, सेवा मात्र टू-जीप्रमाणे दिली जात आहे.

पथदिवे झाकाेळले

आष्टी : परिसरात बहुतांश गावांमधील पथदिव्यांसमोर झाडाच्या फांद्या आल्या आहेत. त्यामुळे पथदिव्यांचा प्रकाश रस्त्यावर पोहोचत नाही. काही पथदिवे वेलींनी झाकोळले आहेत. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पथदिव्यांसमोरील फांद्या तोडाव्यात, अशी मागणी आष्टी परिसरातील नागरिकांकडून हाेत आहे.

एटापल्लीत अतिक्रमण

एटापल्ली : शहरातील रस्त्यालगत तसेच मोकळ्या जागेत अनेकांनी पक्के अतिक्रमण केले आहे. मागील अनेक वर्षांपासून शासकीय जागेवर बस्तान बसवले आहे. एकप्रकारे जागा गिळंकृत करण्याचाच हा प्रकार आहे. स्थानिक प्रशासनाने हे पक्के अतिक्रमण काढण्याची गरज आहे. अतिक्रमण काढल्यास रहदारी सुरळीत हाेईल.

निवासस्थाने निरुपयाेगी

आलापल्ली : शासनाने लाखो रुपये खर्च करून येथे कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधून दिली. मात्र, शासकीय कर्मचारी या निवासस्थानांना ‘खो’ देत असल्याने देखभालीअभावी ही निवासस्थाने ओसाड झाली आहेत. येथील अनेक वन कर्मचाऱ्यांची निवासस्थाने ओसाड दिसून येतात.

जनावरांमुळे रहदारी बाधित

एटापल्ली : शहरातील मुख्य मार्गांवर मोकाट जनावरे मधोमध उभी राहतात. त्यामुळे रहदारी बाधित होत असून, वाहनधारकांना नेहमी अपघाताची भीती असते. अनेक मार्गांवर मोकाट जनावरांमुळे वाहतूक बाधित होते. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. या मागणीकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत आहे.

मालेवाडा भागात समस्या

कुरखेडा : कोरची व धानोरा या दुर्गम भागांना जोडणारा मालेवाडा परिसर आजही शासन व प्रशासनाच्या नजरेत दुर्लक्षित आहे. या भागात ५० किलोमीटरच्या परिसरात केवळ एकाच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भरवशावर आरोग्यसेवा आहे. आरोग्यसेवा सुधारण्याची मागणी होत आहे, परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

Web Title: Pits on Dhodraj Marg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.