एकाच खोलीत चालतो पीएचसीचा कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:23 IST2021-07-22T04:23:14+5:302021-07-22T04:23:14+5:30
प्रवासी निवाऱ्याला झुडपाचा वेढा गडचिरोली : आरमोरी मार्गावर असलेल्या गडचिरोली तालुक्यातील वसा येथील प्रवासी निवाऱ्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. ...

एकाच खोलीत चालतो पीएचसीचा कारभार
प्रवासी निवाऱ्याला झुडपाचा वेढा
गडचिरोली : आरमोरी मार्गावर असलेल्या गडचिरोली तालुक्यातील वसा येथील प्रवासी निवाऱ्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या प्रवासी निवाऱ्याचे छत वादळामुळे पूर्णत: उडाले आहे. प्रवासी निवाऱ्याला वनस्पतींनी वेढा घातला असून, भिंतींना तडे गेले आहेत. त्यामुळे प्रवाशांना धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दूध शीतकरण केंद्र का देत नाही?
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात नागेपल्ली व कनेरी येथे राज्य शासनाचे दूध शीतकरण केंद्र आहे. मात्र, दुधाचे पुरेसे उत्पादन जिल्ह्यात नसल्याने सदर शीतकरण केंद्र सध्या बंद आहे. नव्या सरकारने दुग्ध व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करून शीतकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी होत आहे.
मोबाइल रेंजसाठी नागरिकांची भटकंती
एटापल्ली : तालुक्यातील तोडसा येथे बीएसएनएल टॉवर उभारावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. एटापल्ली तालुक्यात बीएसएनएलचा कव्हरेज राहत नसल्याने नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी येऊन अनेक कामे करावी लागतात. तोडसा परिसरात बीएसएनएलचा कव्हरेज राहत नसल्याने मोठी अडचण होते.
बँकेअभावी ग्रामीण नागरिकांची पायपीट
धानोरा : ग्रामीण भागामध्ये राष्ट्रीय बँकांच्या शाखा नाहीत. धानोरा तालुक्यातील नागरिकांना व्यवहार करण्याकरिता तालुका मुख्यालयात यावे लागते. तालुक्यात मुंगनेर, पेंढरी येथे बँकेची गरज आहे. राष्ट्रीयीकृत बँक नसल्याने मुंगनेर, पेंढरी भागातील नागरिकांना पायपीट करावी लागत आहे.
अभयारण्यातील गावांचे पुनर्वसन रखडले
आष्टी : चामोर्शी तालुक्यातील आष्टी परिसरातील चपराळा अभयारण्यांतर्गत चपराळा व इतर लहान-मोठी चार ते पाच गावे येतात. या अभयारण्यातील पशूंमुळे गावकऱ्यांना धोका आहे. आजपर्यंत वन्यपशूंचे अनेक हल्ले नागरिकांवर झाले आहेत. त्यामुळे या गावांचे पुनर्वसन करण्याची गरज आहे. मात्र, या मागणीकडे दुर्लक्षच आहे.
कोडसेपल्लीत समस्या सोडविण्याची मागणी
अहेरी : परिसरातील दुर्गम भागात वसलेल्या कोडसेपल्ली येथे अनेक समस्यांची भरमार आहे. गावात नाल्यांचा अभाव असल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडचण होत आहे. परिणामी जागोजागी सांडपाणी साचून दुर्गंधी पसरली असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.