जिल्ह्यात काँग्रेसमधून ‘आऊटगोर्इंग’ वाढले

By Admin | Updated: November 18, 2016 01:24 IST2016-11-18T01:24:28+5:302016-11-18T01:24:28+5:30

देसाईगंज व गडचिरोली नगर पालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला गडचिरोली जिल्ह्यात मोठी गळती लागली आहे.

The outgoings in the district increased from the Congress | जिल्ह्यात काँग्रेसमधून ‘आऊटगोर्इंग’ वाढले

जिल्ह्यात काँग्रेसमधून ‘आऊटगोर्इंग’ वाढले

नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर : विद्यमान नगरसेवकांसह अनेकांनी सोडला पक्ष
गडचिरोली : देसाईगंज व गडचिरोली नगर पालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला गडचिरोली जिल्ह्यात मोठी गळती लागली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाला आगामी निवडणुकीत मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
देसाईगंज येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष हिराजी मोटवानी यांनी काँग्रेस पक्षाचा त्याग करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत नागपूर येथे त्यांचा प्रवेश झाला. हिरा मोटवानी यांनी काँग्रेस पक्षाची धूरा अनेक वर्ष देसाईगंज भागात सांभाळली. देसाईगंजच्या विकासातही त्यांनी मोठे योगदान दिले. मात्र त्यांच्या योगदानाची पक्ष स्तरावर विद्यमान नेतृत्वाने दखल घेतली नसल्याने त्यांनी काँग्रेसला रामराम केला. मागील १५ वर्ष काँग्रेस पक्षाच्या नगरसेवक राहिलेल्या निलोफर रकीब शेख यांनीही पक्षातील आरमोरीचे माजी आमदार व पक्षाचे जिल्हा नेतृत्व यांच्यावर तोफ डागत काँग्रेस पक्षाचा त्याग करून बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षात प्रवेश केला. निलोफर शेख या मुस्लीम समाजाच्या मोठ्या नेत्या आहेत. त्यांच्या काँग्रेस सोडण्याने संपूर्ण जिल्ह्यात अल्पसंख्यांक समाजामध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे. अल्पसंख्यांक समाजाच्या अत्यंत कमी महिला नेत्या राजकारणात आहेत. असे असताना काँग्रेसला निलोफर शेख यांना समजूून घेता आले नाही. त्यामुळे त्यांना पक्ष सोडण्याचे पाऊल उचलावे लागले. काँगे्रेस पक्षाच्या पाच वर्ष गडचिरोलीत नगरसेवक राहिलेल्या नयना पेंदोरकर यांनी काँग्रेसला रामराम केला. या मागेही अनेक कारणे आहेत.
याशिवाय देसाईगंजच्या विद्यमान काँग्रेस नगरसेवक भाविका संजय गणवीर, माजी नगरसेवक प्रकाश सांगोळे, भिमराव नगराळे यांनीही अनुक्रमे भाजप व बीआरएसपीत प्रवेश केला आहे. काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष असताना जेसा मोटवानी यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून भिमराव नगराळे व प्रकाश सांगोळे काम करीत होते. मागासवर्गीय समाजातील हे दोन्ही नेते आहेत. त्यांच्या काँग्रेस सोडण्याने मागासवर्गीय समाजाच्याही वोटबँकवर परिणाम होणार आहे. याशिवाय देसाईगंजचे तालुका काँग्रेस अध्यक्ष राहिलेले विलास ढोरे यांनीही बुधवारी काँग्रेसचा त्याग करून भाजपात प्रवेश केला. विलास ढोरे यांच्या भाजप प्रवेशाने या भागातील बहुजन समाजातही काँग्रेस विषयी नाराजीची भावना निर्माण झाली आहे. गेल्या एक ते दीड महिन्यात या मातब्बर नेते व कार्यकर्त्यांच्या काँग्रेस सोडण्याच्या निर्णयामुळे कार्यकर्ते हतबल झाले आहेत. गडचिरोली येथील विद्यमान नगरसेवक पुष्पा कुमरे यांनी काँग्रेसला रामराम करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्कात असून काँग्रेस पक्षाचे नेते या गळतीवरही आनंद व्यक्त करताना दिसून येत आहेत.
या सर्व घटनाक्रमावर बोलताना माजी खासदार मारोतराव कोवासे म्हणाले की, पक्षाचा हा अत्यंत कसोटीचा काळ आहे. या काळातच पक्षाच्या कार्यकर्त्यांचे खरे चेहरे निदर्शनास येतात. काही लोकांच्या पक्ष सोडून जाण्याबाबत आपल्यालाही खंत आहे. परंतु आजकाल राजकारणात आपल्याच घराण्यातील लोकांना पुढे करण्याची भूमिका बळावत आहे. त्यामुळे पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी निवडणुका लढणे कठीण झाले आहे. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होते. पक्ष नेतृत्वाला सर्वांना सांभाळून घ्यावे लागते. मात्र यात नेतृत्व कुठे तरी कमी पडत असले पाहिजे, असे वाटते. पक्षात विरोधी भूमिका घेणारे कुणीतरी असायला हवे. त्याशिवाय राजकारणातही मजा नाही. सर्व मोकळे रान असले तर सर्व काही शक्य होत नाही, असे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: The outgoings in the district increased from the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.