मुंबईच्या प्रदर्शनात सेंद्रिय तांदळाने खाल्ला भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 23:46 IST2018-02-11T23:45:15+5:302018-02-11T23:46:09+5:30
मुंबई येथे ७ ते ९ फेब्रुवारी दरम्यान पॅन आसिया नावाचे नैसर्गिक शेती उत्पादनांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

मुंबईच्या प्रदर्शनात सेंद्रिय तांदळाने खाल्ला भाव
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मुंबई येथे ७ ते ९ फेब्रुवारी दरम्यान पॅन आसिया नावाचे नैसर्गिक शेती उत्पादनांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनादरम्यान मुंबई येथील ६५ निर्यातदार व्यापाऱ्यांनी गडचिरोलीच्या तांदळास घाऊक दरात खरेदी करण्याची उत्सुकता दर्शविली. मात्र शेतकऱ्यांनी स्वत:चा ब्रँड विकसित करून तांदळाची विक्री करण्याचा निर्धार केला असल्याने तांदूळ विक्रीस नकार दिला.
गडचिरोली जिल्हा सेंद्रिय शेती उत्पादक कंपनीच्या (जीओएफएस) या ब्रँडच्या उत्पादकांनी प्रदर्शनात भाग घेतला होता. गडचिरोली जिल्ह्यात आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार यांच्या मार्गदर्शनात सुमारे १ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर सेंद्रीय शेती केली जात आहे. यामध्ये १ हजार ३०० शेतकरी सहभागी आहेत. २०१७ मध्ये ९ हजार क्विंटल मालाचे उत्पादन झाले. चामोर्शी येथील येलावार, आरमोरी येथील मधुकर चापले यांनी प्रदर्शनात भात, भूईमूग, तुरडाळ ठेवली होती. या संपूर्ण उत्पादनांची प्रेक्षकांनी प्रशंसा केली.