बाजारात कांद्याची आवक वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2016 01:19 IST2016-04-25T01:19:56+5:302016-04-25T01:19:56+5:30
एप्रिल महिन्याच्या सुरूवातीस कांद्याची उत्पादन होते. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये कांद्याचा वापर वाढतो.

बाजारात कांद्याची आवक वाढली
खरेदीही वाढली : ४० किलोचा कट्टा ३५० रूपयात
गडचिरोली : एप्रिल महिन्याच्या सुरूवातीस कांद्याची उत्पादन होते. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये कांद्याचा वापर वाढतो. त्यामुळे आठवडी बाजारात कांद्याची आवक वाढली असून किमतीही घटली आहे.
नजीकच्या चंद्रपूर, भंडारा व नागपूर या जिल्ह्यांमध्ये कांद्याची शेती केली जाते. नाशिकला कांद्याचे राज्यातील कोठार समजल्या जाते. मार्च महिन्याच्या शेवटीपासून कांदा निघण्यास सुरूवात होते. त्यामुळे एप्रिल महिन्यामध्ये बाजारपेठेत कांदा दाखल होतो. कांदा जवळपास पाच ते सहा महिने राहत असला तरी तो चांगला राहावा यासाठी तांत्रिक पध्दतीचा अवलंब करावा लागतो. अन्यथा कांदा खराब होण्याची शक्यता राहते. त्यामुळे शेतकरी वर्ग जमिनीतून कांदा काढल्याबरोबरच आठ ते दहा दिवसामध्ये विक्री करतात.
गडचिरोलीतील बाजारात कांदा विक्रीस आणल्या गेला आहे. ४० किलोचा कट्टा ३५० रूपयांना विकला जात आहे. जवळपास ८ रूपये ७५ पैसे एवढा भाव पडत आहे. मागील महिन्याच्या तुलनेत कांदा स्वस्त झाल्याने घेणाऱ्यांचीही संख्या वाढली आहे. (नगर प्रतिनिधी)