‘कृषी’ क्रांतीचे आता नवे पाऊल
By Admin | Updated: June 11, 2014 00:01 IST2014-06-11T00:01:08+5:302014-06-11T00:01:08+5:30
गेल्या काही वर्षापासून जिल्ह्याच्या कृषी क्षेत्रात ट्रॅक्टर, थ्रेशर, पॉवरटीलर आदीसह रब्बी पिकांच्या मळणी यंत्राचा वापर होत आहे. मजुराच्या टंचाईवर मात करणे व उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आत्मा व

‘कृषी’ क्रांतीचे आता नवे पाऊल
शुभारंभ : प्रायोगिक तत्वाच्या यशानंतर राज्यात सर्वप्रथम
गडचिरोली : गेल्या काही वर्षापासून जिल्ह्याच्या कृषी क्षेत्रात ट्रॅक्टर, थ्रेशर, पॉवरटीलर आदीसह रब्बी पिकांच्या मळणी यंत्राचा वापर होत आहे. मजुराच्या टंचाईवर मात करणे व उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आत्मा व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने यंदाच्या खरीप हंगामात यंत्राच्या सहाय्याने जिल्ह्यात ५०० हेक्टर क्षेत्रामध्ये भात पिकाची रोवणी होणार आहे. सार्वजनिक व खासगी भागिदारीचा हा प्रथम प्रकल्प राज्यात गडचिरोली जिल्ह्यात सुरू होत असून हे कृषी क्रांतीचे नवे पाऊल आहे.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद कृषी विभाग व व्ही.एस.टी. टिलर्स ट्रॅक्टर्स लि. बेंगलोर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी गडचिरोलीनजिकच्या पारडी येथे भात लागवडीच्या यांत्रिकीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन जि.प. चे कृषी व पशुसंवर्धन सभापती अतुल गण्यारपवार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम होत्या. प्रमुख अतिथी म्हणून विभागीय कृषी सहसंचालक विजय घावटे, जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, पं.स. सभापती सविता कावळे, आत्माचे संचालक अनंत पोटे, व्ही. एस. टी. टिलर्स ट्रॅक्टर्स लि. बेंगलोरचे प्रमुख बी. एस. अयंगार, पवन माधमशेट्टीवार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कृषी सभापती अतुल गण्यारपवार म्हणाले, मुलचेरा तालुक्यात आदिवासी शेतकरी बचत गटाच्या महिलांनी यंत्राद्वारे भार पिकाची रोवणी केली व भरघोष उन्हाळी धान पिकाचे उत्पादन घेतले. यांत्रिकीकरणामुळे जिल्ह्यातील कृषी क्षेत्राचा विकास जलदगतीने होणार असेही गण्यारपवार म्हणाले. जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी यांत्रिकीकरणातून धानाच्या दुबार पिकाला चालना मिळेल. यंत्रामुळे शेती क्षेत्रात कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये भरपूर उत्पादन घेणे शक्य होईल, असे सांगितले. याप्रसंगी कृषी सहसंचालक विजय घावटे यांनीही मार्गदर्शन केले. उद्घाटनानंतर बळीराजा बहुउद्देशिय शेतकरी मंडळाचे सदस्य वसंत नागोसे यांच्या शेतात यंत्राद्वारे भात पिकाच्या रोवणीचे व मॅट नर्सरीचे प्रात्याक्षिक करण्यात आले. यावेळी आत्माचे अधिकारी, बेंगलोर कंपनीचे कामगार व जि.प. चे कृषी विकास अधिकारी विजय कोळेकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मॅट नर्सरीबद्दल तसेच यंत्राद्वारे भात पिकाची रोवणी कशी करायची हे पटवून दिले. यावेळी भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली धान उत्पादक जिल्ह्यातील जवळपास ६०० शेतकरी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)