पीक कर्जासाठी बेबाकी प्रमाणपत्राची गरज नाही
By Admin | Updated: September 17, 2016 01:51 IST2016-09-17T01:51:50+5:302016-09-17T01:51:50+5:30
पीक कर्ज वितरणासाठी रिझर्व्ह बँकेने दिलेल्या निर्देशांचे बँकेने पालन करावे, कर्ज वितरणासाठी कोणत्याही बेबाकी प्रमाणपत्राची गरज नाही.

पीक कर्जासाठी बेबाकी प्रमाणपत्राची गरज नाही
जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज वितरित करावे
गडचिरोली : पीक कर्ज वितरणासाठी रिझर्व्ह बँकेने दिलेल्या निर्देशांचे बँकेने पालन करावे, कर्ज वितरणासाठी कोणत्याही बेबाकी प्रमाणपत्राची गरज नाही. याची जाणीव ठेवून कर्ज वितरण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी दिले.
गुरूवारी स्थानिक बँक आॅफ इंडिया शाखेस जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. त्याप्रसंगी बँक अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. पीक कर्ज वाटप तसेच पुनर्गठण यासह विविध केंद्रीय वैैयक्तिक लाभाच्या योजनांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी घेतला. बैठकीला अग्रणी बँक अधिकारी एस. आर. खांडेकर, उपविभागीय अधिकारी तळपादे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, शाखा व्यवस्थापक कैलास मडावी, सहाय्यक व्यवस्थापक श्वेता पाटील हजर होते.
प्रत्येक बँक शाखेने आपला वार्षिक वित्त आराखडा सादर करावा. त्यात प्राधान्याने पीक कर्ज पुरवठा आणि इतर बाबींचा समावेश करावा, असे नायक म्हणाले. सर्व बँकाना शैक्षणिक कर्जासाठीही उद्दिष्ट देण्यात आलेले आहे, याचीही पुर्तता करणे गरजेचे आहे. दरम्यान जिल्हाधिकारी नायक यांनी पत्रकारांशी स्थानिक समस्याबाबत चर्चा करुन समस्या जाणून घेतल्या. (शहर प्रतिनिधी)
महिला बचत गटांची मदत घ्या
केंद्र शासनाच्या थेट वैयक्तिक लाभासाठी अशा लाभधारकांचे खाते उघडणे आणि ते आधार क्रमांकाशी संलग्न करणे यासाठी सर्वच बँकानी येणाऱ्या काळात मिशन मोड मध्ये काम करण्याची गरज आहे. असे सांगून ते म्हणाले की, बँकानी आपल्या सेवा क्षेत्रात घरनिहाय बँक खाते उघडले की नाही याची खातरजमा करुन घ्यावी यासाठी महिला बचत गटांची मदत घेणे आवश्यक आहे.
२५ पर्यंत शेवटची मुदत
खरिपासाठी कर्ज वाटपाची मुदत २५ सप्टेंबरपर्यंत आहे. सध्या चामोर्शी शाखेने १ कोटी ३८ लाख रुपये पीक कर्ज दिलेले आहे. तुलनेत ५० टक्के इतके पीक कर्ज वाटप शाखेने केलेले आहे. उर्वरित काळात कोणत्याही अटी शर्ती न घालता बँकेने उद्दिष्ट पुर्तीसाठी प्रयत्न करावे, असेही नायक म्हणाले.