नवख्या उमेदवारांची झाली गर्दी
By Admin | Updated: September 29, 2014 00:45 IST2014-09-29T00:45:16+5:302014-09-29T00:45:16+5:30
गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, अहेरी, गडचिरोली या तीन विधानसभा मतदार संघात यावेळी अनेक नवखे उमेदवार मैदानात उतरले आहेत. ज्यांचे नावही आजवर कधीतरीच ऐकले असतील,

नवख्या उमेदवारांची झाली गर्दी
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, अहेरी, गडचिरोली या तीन विधानसभा मतदार संघात यावेळी अनेक नवखे उमेदवार मैदानात उतरले आहेत. ज्यांचे नावही आजवर कधीतरीच ऐकले असतील, अशाही उमेदवारांनी यंदा उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. त्यामुळे हे नवखे उमेदवार चर्चेचा विषय मतदार व राजकीय वर्तुळातही आहे.
आरमोरी विधानसभा क्षेत्रातून भारतीय जनता पक्षाने क्रिष्णा दामाजी गजबे यांना उमेदवारी दिली आहे. गजबे यांचे नाव बऱ्याच मतदारांनी पहिल्यांदाच ऐकले आहे. देसाईगंज तालुक्यातील पोटगाव ग्रामपंचायतचे ते सरपंच आहेत. भारतीय जनता पक्षाचे निष्टावान नेतृत्व असलेले नाकाडे परिवाराचे कौंटुंबिक सदस्य अशीही गजबे यांची ओळख आहे. असाच नवखा चेहरा राष्ट्रवादी काँग्रेसने नारायण वटी यांच्या रूपाने उतरविला आहे. नारायण वटी हे सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी आहेत. ते ही राजकारणात पहिल्यांदाच पदार्पण करीत आहेत. माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र चंदेल यांचे बंधू जयेंद्र चंदेल गेल्या आठ दिवसात चर्चेत आले. आजवर अनेकांना याची माहितीही नव्हती. त्यांचाही उमेदवारी अर्ज या मतदार संघात दाखल झाला आहे.
अॅड. प्रतापशहा मडावी हे ही एक नवखे उमेदवार मैदानात उतरले आहेत. त्यांचे वडील हे सेवानिवृत्त न्यायाधीश असल्याचे सांगण्यात येत आहे. अहेरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे उमेदवार मुक्तेश्वर गावडे हे परिचीत आहेत. मात्र जिल्ह्याच्या इतर भागातील अनेकांसाठी गावडे हे नवखेच आहेत. गावडे हे एटापल्ली तालुक्यातून जिल्हा परिषदेचे सदस्य होते. माजी खासदार नरेश पुगलिया यांचे ते खास समर्थक आहेत. राजकारणातील मृदुभाषिक चेहरा अशी गावडेंची ओळख आहे. त्यांनी एकट्यांनीच पक्षाकडे उमेदवारीसाठी मुलाखत दिली होती.
गडचिरोली विधानसभा क्षेत्रातही अनेक नवीन चेहरे यावेळी मैदानात दिसत आहे. मनसेकडून रंजीता कोडाप हा नवा चेहरा मैदानात आहे. डॉ. देवीदास मडावी, महाराष्ट्र ग्राम विकास आंदोलनाच्यावतीने जयश्री वेळदा, मोरेश्वर किलनाके आदी अगदीच नवे उमेदवार नामांकन पत्र दाखल करून आहेत. यांनी यापूर्वीही कधी निवडणूक लढविल्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी अशी त्यांची कोरी पाटी आहे. या सोबतच तीनही विधानसभा क्षेत्राचा विचार करता काही जुने मुरब्बीही व अनेक निवडणुकात मैदानात लढलेले उमेदवारही रिंगणात आहेत. यामध्ये शिवसेनेचे डॉ. रामकृष्ण मडावी, काँग्रेसचे आनंदराव गेडाम, अपक्ष नंदू नरोटे, जयदेव मानकर, रामसुराम काटेंगे कोरची यांचा समावेश आहे. अहेरी क्षेत्रात धर्मरावबाबा आत्राम, मुतन्ना पेंदाम, आमदार दीपक आत्राम, कैलाश कोरेत, प्रभुदास आत्राम, रामेश्वर आत्राम, दिनेश मडावी यांचा समावेश आहे. प्रभुदास आत्राम यापूर्वी वनखात्यात नोकरीला होते. त्यांनी २०१२ मध्ये सिरोंचा तालुक्यातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढविली. तर रामेश्वर जगन्नाथराव आत्राम हे अहेरीचे माजी सरपंच आहेत. ते उत्कृष्ट क्रिकेटपटूही आहेत. त्यांनी धर्मरावबाबांचा डमी म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला, अशी राजकीय गोटात चर्चा आहे.