वनव्यवस्थापन समित्यांचे वृक्षतोडीकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:37 IST2021-04-20T04:37:33+5:302021-04-20T04:37:33+5:30
आष्टी : आष्टी परिसरात मोठ्या प्रमाणात झाडांची तोड केली जात आहे. याकडे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत ...

वनव्यवस्थापन समित्यांचे वृक्षतोडीकडे दुर्लक्ष
आष्टी : आष्टी परिसरात मोठ्या प्रमाणात झाडांची तोड केली जात आहे. याकडे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. वृक्षतोड थांबविण्यासाठी गावागावात संयुक्त वनव्यवस्थापन समित्या असल्या तरी या समित्यांचही जंगलतोडीकडे दुर्लक्ष होत.
अनेक कोल्हापुरी बंधारे जीर्णावस्थेत
गडचिरोली : सिंचाई विभागाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यात नाल्यांवर शेकडो कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र मागील अनेक वर्षांपासून या बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यात आली नाही. अनेक बंधारे फुटले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी साचून राहत नाही.
वीज खांब लावण्याकडे महावितरणचे दुर्लक्ष
गडचिरोली : जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायत प्रशासनाने महावितरणकडे वीज खांबाचे पैसे भरून वीज खांब मंजूर करून घेतले आहे. वारंवार मागणी करूनही महावितरणच्या वतीने वीज खांब लावण्याकडे दुर्लक्ष होत आहे.
बांधकाम मजूर नोंदणीपासून वंचित
धानोरा : बांधकाम कामगारांची नोंदणी ग्रामपंचायस्तरावर करण्याचे निर्देश शासनाने दिले असले तरी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे दिसून येत नाही. ग्रा. पं.च्या जनजागृतीअभावी दुर्गम भागातील बांधकाम मजूर वंचित आहे
तलावात अतिक्रमण
धानोरा : तालुक्यातील अनेक मामा तलावांमध्ये सभोवतालच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून त्यामध्ये धानाच्या बांध्या निर्माण केल्या आहेत. त्यामुळे जलपातळीत घट झाली आहे. सदर अतिक्रमण हटविण्याकडे सिंचाई विभागाचे दुर्लक्ष होत आहे. अतिक्रमणामुळे तलाव नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
सोमनूर पर्यटन दुर्लक्षित
सिरोंचा : भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिरोंचा तालुक्यातील सोमनूर संगमाच्या विकासाकडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष होत आहे. सोमनूर घाटावर गोदावरी, प्राणहिता व इंद्रावती या तीन नद्यांचा संगम आहे. महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी जत्रा भरत असून, हजारो भाविक उपस्थित राहतात.
शाळा संरक्षक भिंतीविना
गडचिरोली : जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १५५१ प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत. यापैकी नक्षलग्रस्त व दुर्गम भागातील शेकडो शाळांना संरक्षण भिंतीच नाही. त्यामुळे या शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. शाळेच्या परिसरात मोकाट जनावरांचा वावर असतो.
आरमोरीत अतिक्रमण
आरमोरी : शहरात रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. प्रशासनाने सदर अतिक्रमण तत्काळ काढावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. मात्र याकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष आहे. प्रशासनाने कारवाई करून येथील अतिक्रमण काढावे, अशी मागणी आहे.
वयोवृद्धांना पेन्शन द्या
चामोर्शी : जिल्ह्यात वयोवृद्ध ओबीसी शेतकरी व शेतमजुरांची संख्या मोठी असून, त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी ओबीसी प्रवर्गातील शेतकरी, शेतमजुरांना वयाच्या ६० वर्षांनंतर प्रति महिना तीन हजार रुपये वृद्धापकालीन अर्थसाहाय्य पेन्शन योजना लागू करण्यात यावी.
अहेरीत वाहतूक कोंडी
अहेरी : अहेरी शहरातील बाजारपेठेत दुकानदारांनी रस्त्यावर अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी येणारे ग्राहकही रस्त्याच्या बाजूलाच दुचाकी वाहने पार्किंग करतात. त्यामुळेही रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. अतिक्रमण हटवावे.
रस्त्यांची दुरुस्ती करा
गडचिरोली : शहरातील विवेकानंदनगरातील रस्त्यांची नगर परिषदेने दुरुस्ती केली नाही. त्यामुळे या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष होत आहे. खड्ड्यांबरोबरच या परिसरातील नाल्यांचाही नियमितपणे उपसा केला जात नाही. परिणामी या ठिकाणच्या नाल्या तुडुंब आहेत.
सिंचन प्रकल्प रखडले
गडचिरोली : जिल्ह्यात वनजमिनीवर उभे करावयाचे सिंचन व क्रीडा संकुलाचे प्रकल्प राज्य सरकारकडून जमिनीची एनपीव्ही रक्कम न मिळाल्यामुळे रखडले आहे. वनजमिनीसाठी कोट्यवधी रुपयाची रक्कम भरावी लागणार आहे. वनजमिनीसाठी कोट्यवधी रुपयांचा भरणा करावा लागणार आहे.