गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्यांनी जाळले वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे निवासस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 21:45 IST2020-06-10T21:44:47+5:302020-06-10T21:45:18+5:30
भामरागड वनविभागांतर्गत येणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी सशस्त्र नक्षलवाद्यांनी जाळपोळ केली.

गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्यांनी जाळले वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे निवासस्थान
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : एटापल्लीपासून ३६ किमी अंतरावरील गट्टा या भामरागड वनविभागांतर्गत येणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी सशस्त्र नक्षलवाद्यांनी जाळपोळ केली. यात दुचाकी, काही साहित्य व कागदपत्रे जळाली असून काही साहित्य, मोबाईल नक्षलवाद्यांनी पळवून नेले. यावेळी उपस्थित दोन वनरक्षकांनाही बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवारच्या रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, गट्टा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याच्या कार्यालयाजवळच असलेल्या त्यांच्या सरकारी निवासस्थानात गोविंद अमृत दोहतरे (४०) हे गट्टा क्षेत्राचे बीट गार्ड आणि राजू मारोती झोरे (४५) हे कुंजेमर्का क्षेत्राचे बीट गार्ड झोपले असताना रात्री १०.३० वाजताच्या सुमारास नक्षलवाद्यांनी दारावर थाप मारली. कोण आहे असे विचारले असता, ‘मी गट्टा येथील नागरिक आहे’ असा आवाज बाहेरून आल्याने त्यांनी दार उघडले असता नक्षल्यांनी त्यांच्यावर बंदुक ताणून बाहेर काढले आणि हात बांधून व डोळ्यांवरही पट्टी बांधली. त्यांच्याकडील मोबाईल घेऊन तुम्ही झारेवाडा रोडचे सर्व्हेक्षण करता काय, तुमचे रेंजर पाटील कधी येणार, तो पोलीस स्टेशनचे सर्व्हेक्षणाचे काम करत आहे न, आदिवासींचे तिरकमान जप्त करतो काय, असे म्हणत जबर मारहाण केली. त्यानंतर निवासस्थानासमोर असलेली दुचाकी आत टाकून निवासस्थान पेट्रोल टाकून पेटवून दिले. यात निवासस्थानातील सर्व महत्त्वाचे दस्तावेज जळूक खाक झाले तसेच भिंतीही फुटून गेल्याचे वनरक्षकांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
वनरक्षकांचे हात आणि पट्टी सोडून नक्षलवादी जंगलात पसार झाले. नक्षल्यांनी जुन्या स्टोअर रुमचे कुलूप तोडून संयुक्त व्यवस्थापन समितीचे साहित्य, वाळवी यांचे मंडप डेकोरेशन व कॅटरिंगचे सामान व भांडी, गॅस सिलेंडर तसेच वनविभागाचे जीपीएस, मोबाईल, पेन ड्राईव्ह, नकाशे व इतर साहित्य नेल्याची तक्रार वनरक्षकांनी केली आहे.
निशाण्यावर अधिकारी, सापडले कर्मचारी
सदर प्रतिनिधीने दुपारी ३:३० च्या सुमारास घटनास्थळी भेट दिली असता दोन्ही वनरक्षक पोलीस मदत केंद्रात होते. त्यांची कोणत्याही वनअधिकारी किंवा वन कर्मचाऱ्याने भेट घेतली नाही. त्यांच्यापैकी एका वनरक्षकाशी एटापल्ली तालुक्यातील वेगवेगळ्या रेंजमध्ये कार्यरत असताना दोन वेळा अशा प्रकारच्या घटनांना सामोरे जावे लागले. त्यांनी बदलीसाठी मागणी केली होती परंतू वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. यावेळी आरएफओ पाटील हे नक्षल्यांच्या निशाण्यावर असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पण कनिष्ठ कर्मचारी नक्षल्यांच्या हाती लागले.