नक्षलपीडितांच्या कुटुंबीयांची चार लाखांतच बोळवण

By Admin | Updated: December 9, 2014 22:49 IST2014-12-09T22:49:20+5:302014-12-09T22:49:20+5:30

गडचिरोली या नक्षल प्रभावित जिल्ह्यासह चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ४९४ वर निरपराध आदिवासी नागरिक आजवर मारल्या गेले. मात्र या नागरिकांच्या कुटुंबीयांना केंद्र

Naxalpreet's family divided into four lakhs | नक्षलपीडितांच्या कुटुंबीयांची चार लाखांतच बोळवण

नक्षलपीडितांच्या कुटुंबीयांची चार लाखांतच बोळवण

गडचिरोली : गडचिरोली या नक्षल प्रभावित जिल्ह्यासह चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ४९४ वर निरपराध आदिवासी नागरिक आजवर मारल्या गेले. मात्र या नागरिकांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारकडून ३ व राज्य सरकारकडून १ लाखाची आर्थिक मदत देऊन त्यांची बोळवण करण्यात आली आहे. अनेकांना सरकारी नोकरीत सामावून घेऊ, असे देण्यात आलेले आश्वासन हवेत विरले आहे.
सरकारने आत्मसमर्पित नक्षलवाद्यांसाठी भरगच्च आर्थिक तरतुदीचे पॅकेज जाहीर करून आत्मसमर्पणाचा ओघ वाढविण्याचे काम सुरू केले आहे. दुसरीकडे मात्र ज्यांच्या कुटुंबाचा कर्ता माणूस नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ठार झाला. ते कुटुंब ४ लाखांची मदत घेऊनही नक्षली दडपणात जीवन जगत आहे. काही कुटुंबातील तर २ ते ३ सदस्य नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मारल्या गेले आहेत. त्यांच्या पुनर्वसनाचा कोणताही कार्यक्रम नक्षलग्रस्त जिल्ह्यासाठी सरकारने तयार केला नाही. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मारल्या जाणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या आर्थिक मदतीचे निकष सर्वसामान्यांच्या हत्येसाठीही लावण्यात यावे व तशी आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी सातत्याने हे कुटुंबिय करीत आहेत. परंतु सरकारने या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम केले आहे. केंद्र सरकारकडून निधी येईल तेव्हा ती मदत दिली जाते. अद्यापही गेल्या सहा महिन्यांत नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या कुटुंबाचे प्रस्ताव मदतीच्या मंजुरीसाठी पडून आहेत. अशीच परिस्थिती नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांचीही आहे. त्यांना लागलेला वैद्यकीय खर्च लाखांच्या घरात आहे. तर सरकारकडून मिळालेली मदत ५ ते २५ हजारांच्या टप्प्यात आहे. आपल्या बंदुकीच्या गोळीने सामान्यांचे जीव घेतले ते नक्षलवादी आता आत्मसमर्पण करून रोख रक्कमांसह सरकारकडून भूखंड व आदी साधन सुविधा मिळवून घेत आहेत. मात्र सर्वसामान्यांचे कुटुंब सरकारकडून आपल्या कुटुंबातील सदस्यांना नोकरी मिळविण्यासाठी पत्र प्रपंच करण्यातच धावपळ करीत आहे. भामरागड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहिलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बहाद्दूरशहा अलाम यांची हत्या झाली. त्यांच्या कुटुंबालाही साधारण आर्थिक मदत देऊन सरकारने बोळवण केली. त्यांच्या मुलाला सरकारी नोकरीचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु याबाबतही पुढे कार्यवाही झाली नाही. त्यांचा मुलगा जिल्हास्तरावर अधिकाऱ्यांकडे आपले निवेदन घेऊन भटकत असल्याचे चित्र दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे एटापल्ली तालुक्यातील ज्येष्ठ नेते केवल सावकार अतकमवार यांचीही नक्षलवाद्यांनी हत्या केली. त्यांच्या मुलीने तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे आपली व्यथा मांडली. त्यांच्याही कुटुंबीयांना इतरांप्रमाणेच ४ लाखांची मदत देऊन वाऱ्यावर सोडण्यात आले. एटापल्ली पंचायत समितीचे माजी सभापती धिसू मट्टामी यांच्याही कुटुंबीयांची अशीच व्यथा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राकाँच्या तीन नेत्यांच्या कुटुंबीयांना नक्षली हल्ल्यात मारल्या गेले म्हणून प्रत्येकी २ लाखांची मदत दिली. परंतु राकाँची सरकार म्हणून त्यावेळी या संदर्भात काही धोरण निश्चित करण्याची गरज असताना तसे धोरण तयार करण्यात आले नाही. राज्यात आता सेना-भाजपचे युती सरकार आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष बाब म्हणून १९८० पासून २०१४ पर्यंत नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या सर्वसामान्य ४९० लोकांच्या कुटुंबीयांना किमान प्रत्येकी ५० लाख रूपये आर्थिक मदत व दुर्गम भागातील कुटुंबीयांचे शहरात पुनर्वसन त्यांना घर व इतर सोयीसुविधा निर्माण करून देणारे धोरण निश्चित करावे, अशी या सर्वांची मागणी आहे. या संदर्भात जिमलगट्टा येथे काही दिवसांपूर्वी एका पीडित कुटुंबातील सदस्यांच्या पत्नीनेही आमरण उपोषण करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आजवर सरकार नक्षलवाद निर्मूलनाच्या नावाखाली करोडो रूपयांचा विकास निधी भौतिक गरजांवर खर्च करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पीडित कुटुंबांच्या वाट्याला काहीही आलेले नाही. अनेक कंत्राटदारांची हत्या सरकारचे विकास काम पूर्ण करताना झाली. त्यांच्या कुटुंबीयांनाही अतिरिक्त आर्थिक मदत कुठलीही देण्यात आली नाही.

Web Title: Naxalpreet's family divided into four lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.