नक्षलपीडित कुटुंबाचे उपोषण

By Admin | Updated: July 7, 2015 01:25 IST2015-07-07T01:25:54+5:302015-07-07T01:25:54+5:30

पोलिसांना मदत करता-करता नक्षल दहशतीचा बळी ठरलेले दोघे जण शेवटचा उपाय म्हणून सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आमरण उपोषणास बसले आहेत.

Naxalite family fasting | नक्षलपीडित कुटुंबाचे उपोषण

नक्षलपीडित कुटुंबाचे उपोषण

दिलेले आश्वासन सरकारने पाळले नाही : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर
गडचिरोली : पोलिसांना मदत करता-करता नक्षल दहशतीचा बळी ठरलेले दोघे जण शेवटचा उपाय म्हणून सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आमरण उपोषणास बसले आहेत.
व्यंकटी अंकलू बुर्ले व पुष्पा लिंगाजी गंदम अशी उपोषणकर्त्यांची नावे असून, ते सध्या चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे वास्तव्यास आहेत. व्यंकटी बुर्ले यांचे मूळ गाव अहेरी तालुक्यातील छल्लेवाडा हे आहे. त्यांचे वडील अंकलू बुर्ले हे पोलीस व वनविभागासाठी खबरे म्हणून काम करीत होते. १९ फेब्रुवारी १९९५ रोजी नक्षलवाद्यांनी अंकलू बुर्ले यांना छल्लेवाडा येथे गोळ्या घालून ठार केले. त्यांच्या हत्येच्या सर्व नोंदी पोलीस विभागाने घेतल्या. पुढे त्यावेळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अंकलू बुर्ले यांच्या कुटुंबीयांचे चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे पुनर्वसन केले. त्यांना एक भूखंड व लहानसे घरकुल बांधून दिले आणि अंकलू बुर्ले यांचे चिरंजीव व्यंकटी बुर्ले यांना सरकारी सेवेत सामावून घेण्याचे आश्वासनही दिले होते. तेव्हापासून व्यंकटी बुर्ले यांनी पोलीस व महसुल विभागाचे अधिकारी आणि मंत्र्यांच्या कार्यालयांचे उंबरठे झिजविले. परंतु काहीही उपयोग झाला नाही.
असेच प्रकरण पुष्पा लिंगाजी गंदम यांचे आहे. त्यांचेही मूळ गाव छल्लेवाडा हे आहे. पुष्पाचे वडील लिंगाजी गंदम हे पोलीस खबऱ्या म्हणून काम करीत होते. त्यांना नक्षल्यांनी १९ फेब्रुवारी १९९५ याच दिवशी पोलिसांना माहिती देतो म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. पुढे आणखी १३ जून १९९५ रोजीही त्यांना ठार मारण्याचे धमकीपत्र मिळाले होते. पुढे लिंगाजी गंदम यांनाही भूखंड व घरकुल देऊन त्यांचे पुनर्वसन केले. विशेष म्हणजे, लिंगाजी गंदम हे वन्यजीवांची शिकार व तस्करीबाबत वनाधिकाऱ्यांना माहिती देत होते. याबाबतचे प्रमाणपत्रही दक्षिण चंद्रपूर वनवृत्ताचे तत्कालीन वनसंरक्षक व्ही. टी. पत्की यांनी त्यांना दिले होते. विशेष म्हणजे, पुनर्वसनानंतर लिंगाजी गंदम यांचा मुलगा दिलीप गंदम हा अहेरी येथील प्राणहिता उपमुख्यालयात पोलीस गाइड म्हणून काम करु लागला. दरम्यान दिलीपचा मृत्यू झाला. त्यामुळे त्याची बहीण पुष्पा गंदम हिच्याकडे आई-वडिलांच्या पालनपोषणाची जबाबदारी आली. मात्र सरकारने नोकरीचे आश्वासन देऊनही काहीही न केल्याने त्यांच्यापुढे उदरनिवार्हाचा प्रश्न उभा ठाकला आहे. परंतु नक्षल्यांच्या भीतीमुळे ते गावी जाऊन जमिनीची मशागत करु शकत नाही. त्यामुळे छल्लेवाडा येथील जमीन सरकारजमा करुन तेवढीच जमीन आष्टी येथे उपलब्ध करुन द्यावी, अशी त्यांची मागणी आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Naxalite family fasting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.