मोहफुलाच्या दारूची विक्री जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:32 IST2021-01-17T04:32:07+5:302021-01-17T04:32:07+5:30
गडचिरोली : चंद्रपूरच्या दारूबंदीनंतर चंद्रपूर जिल्ह्यातून होणारा दारूचा पुरवठा थांबला. त्यामुळे गडचिरोलीच्या जंगलात विविध भागात मोहफुलाची दारू काढण्याचा धंदा ...

मोहफुलाच्या दारूची विक्री जोरात
गडचिरोली : चंद्रपूरच्या दारूबंदीनंतर चंद्रपूर जिल्ह्यातून होणारा दारूचा पुरवठा थांबला. त्यामुळे गडचिरोलीच्या जंगलात विविध भागात मोहफुलाची दारू काढण्याचा धंदा जोरात सुरू झाला आहे. अनेक ठिकाणी ग्रामीण भागात मोहफुलाची दारू काढून ती गावागावात पोहोचविली जात आहे.
कठड्यांअभावी वृक्षसंवर्धन धोक्यात
एटापल्ली : तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींनी वृक्षारोपण केले आहे. मात्र या वृक्षांचे जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी कठडे बांधण्यात आले नाही. त्यामुळे लावलेले वृक्ष जनावरांचे खाद्य बनत चालले आहे. अर्ध्यापेक्षा अधिक वृक्ष नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. कठडे पुरविण्याची मागणी आहे.
उंच पूल बांधण्याकडे दुर्लक्ष
कमलापूर : अहेरी तालुक्याच्या कमलापूर भागात नदी व नाल्यांची संख्या मोठी आहे. अनेक गावांना जाताना नाले पडतात. मात्र या नाल्यावर अद्यापही पुलाचे बांधकाम करण्यात न आल्याने नागरिकांना पावसाळ्यात पाण्यातूनच आवागमन करावे लागते. मात्र या गंभीर समस्येकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
आरोग्य उपकेंद्रांना इमारतीची प्रतीक्षा
गडचिरोली : उपकेंद्र गावातीलच एका लहानशा भाड्याच्या खोलीत चालविले जात आहे. इमारत नसल्याने प्रसूती कक्षाची सुविधा नाही. त्यामुळे लांब अंतरावर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदर मातांना प्रसूतीसाठी न्यावे लागत आहे. आरोग्य उपकेंद्रासाठी स्वतंत्र इमारत बांधण्याची मागणी होत आहे.
काेल्हापुरी बंधाऱ्यांची दुरुस्ती केव्हा होणार?
गडचिरोली : सिंचन विभागाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यात नाल्यांवर शेकडो कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र मागील अनेक वर्षांपासून या बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यात आली नाही. अनेक बंधारे फुटले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी साचून राहत नसल्याने सभोवतालचे शेतकरी अडचणीत आले आहेत.
दूध शीतकरण केंद्र सुरू करण्याची मागणी
अहेरी : तालुक्यातील आलापल्लीनजीक असलेल्या नागेपल्ली येथील शासकीय दूध शीतकरण केंद्राची इमारत बेवारस स्थितीत आहे. लाखो रुपये खर्चून सदर इमारत बांधण्यात आली. मात्र या ठिकाणी यंत्रसामुग्री आणण्यात आली नाही. मागील १० वर्षांपासून या इमारतीच्या डागडुजीकडे दुर्लक्ष झाले आहे.
बायपास रस्त्याची समस्या त्वरित सोडवा
वडधा : वडधा हे गाव परिसरातील महत्त्वपूर्ण गाव मानले जाते. परिसरातील नागरिक वडधा येथे कामानिमित्त येत असल्याने नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे अनेक वर्षापासून येथे बायपास रस्त्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. मात्र अजूनपर्यंत प्रशासनाने वडधा येथे बायपास रस्त्याची निर्मिती केली नाही.
पर्जन्यमापक वास्तूची दुरुस्ती करा
सिरोंचा : ब्रिटिशकालीन सत्ताकाळात सिरोंचा तालुका मुख्यालयी हवामान खात्याच्या अखत्यारित असलेल्या पर्जन्यमापक वास्तूची दुरवस्था झाली आहे. पूर्णत: दगडाने बांधण्यात आलेल्या या वास्तूची दुरुस्ती करावी, अशी मागणी आहे.
मूलभूत समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष
एटापल्ली : तालुक्यातील अनेक दुर्गम व अतिदुर्गम गावे आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. गावात अद्यापही अनेक समस्या जैसे थे आहेत. त्यामुळे नागरिकांना विकासासाठी अडचणीचा सामना करावा लागत आहे. परंतु याकडे दुर्लक्ष आहे.
कुरखेडातील नळ जोडणीची तपासणी करा
कुरखेडा : शहरातील अनेक वॉर्डांमध्ये घरगुती नळाला मोटारपंप लावून वरच्या मजल्यावर सर्रास पाणी खेचल्या जात आहे. यामुळे इतर नागरिकांच्या नळाला पुरेसा पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे नळ जोडणीची तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.
चामोर्शी-आष्टी मार्गावर खड्डे वाढले
चामोर्शी : जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या महत्त्वपूर्ण चपराळा देवस्थानकडे जाणाऱ्या चामोर्शी-आष्टी-चपराळा या डांबरीकरण मार्गावर जागोजागी खड्डे निर्माण झाले आहेत. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. खड्डे त्वरित बुजवावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
कमी रेंजमुळे भ्रमणध्वनीधारक त्रस्त
जारावंडी : परिसरातील भ्रमणध्वनी सेवा मागील अनेक दिवसापासून विस्कळीत होत असल्याने, या भागातील विविध कंपनीच्या भ्रमणध्वनी ग्राहकांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे भ्रमणध्वनी मनोऱ्यांची रेंज वाढवावी, अशी मागणी परिसरातील ग्राहकांनी केली आहे.
वनहक्क पट्ट्यापासून नागरिक वंचित
कमलापूर : शासनाने वनहक्क अधिनियम २००६ अन्वये वनजमिनीचे पट्टे देण्याचे धोरण अंमलात आणले आहे. मात्र कागदपत्रांच्या अटीमुळे अद्यापही जिल्ह्यातील अनेक गरजू व गरीब नागरिक वनहक्काच्या पट्ट्यापासून वंचित असल्याचे दिसून येत आहे.