भ्रमणध्वनी सेवा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:35 IST2021-04-15T04:35:07+5:302021-04-15T04:35:07+5:30

सिरोंचा : तालुक्यातील आसरअल्ली परिसरात सात ते आठ गावांचा समावेश आहे. परंतु या भागातील बीएसएनएल कव्हरेज व इंटरनेट सेवा ...

Mobile service disrupted | भ्रमणध्वनी सेवा विस्कळीत

भ्रमणध्वनी सेवा विस्कळीत

सिरोंचा : तालुक्यातील आसरअल्ली परिसरात सात ते आठ गावांचा समावेश आहे. परंतु या भागातील बीएसएनएल कव्हरेज व इंटरनेट सेवा वारंवार विस्कळीत होत असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. अंकिसा परिसरातील लक्ष्मीदेवीपेठा, बालमुत्त्यमपल्ली, कंबालपेठा, राघवरावनगर, जंगलपल्ली, गेर्रेपल्ली आदी गावे येतात.

अंकिसात स्वच्छतेकडे ग्रा.पं.चे दुर्लक्ष

अंकिसा : शासनाच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर यासाठी जनजागृती केली जात आहे. परंतु अंकिसा येथे राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला सर्वत्र प्लास्टिक, कचरा, काचेच्या बाटल्या व अन्य कचरा दिसून येतो.

मुलचेराला जोडणारे मार्ग खड्डेमय

मुलचेरा : तालुक्याला जोडणाऱ्या अहेरी, चंद्रपूर, गडचिरोली या तिन्ही मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडून दुरवस्था झाली असल्याने वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. मुलचेरा तालुक्यात ६८ गावांचा समावेश आहे. देशबंधू ग्राम मार्गे तहसील कार्यालय, महाराष्ट्र बँक, वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, कृषी कार्यालय, भूमि अभिलेख कार्यालय, सहकारी बँक आहे. या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे.

टिल्लू पंप लावणारे कारवाईपासून दूर

गडचिरोली : शहरातील अनेक वॉर्डात टिल्लू पंप लावून अवैधरित्या पाणी ओढले जात आहे. परिणामी अनेक वॉर्डातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नळांना केवळ पाच ते सहा गुंड पाणी येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. नळाला पाणी आल्यानंतर अनेक नागरिक छुप्या पद्धतीने लावलेला टिल्लू पंप सुरू करतात.

डास निर्मूलनासाठी धुरळणी करा

धानोरा : अनेक वर्षांपासून धुरळणी झाली नाही. वाढणाऱ्या डासांच्या पैदासीवर नियंत्रण ठेवण्यासाठी धुरळणी करण्यात यावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून प्रशासनाकडे करण्यात येत आहे. मात्र नगरपंचायतीचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

वीज कर्मचाऱ्यांना मुख्यालय सक्ती करा

आलापल्ली : ग्रामीण भागात कार्यरत असलेले बहुतांश वीज कर्मचारी मुख्यालयी न राहता गडचिरोली, चामोर्शी येथे राहून ये-जा करतात. रात्रीच्या सुमारास बिघाड निर्माण झाल्यास हा बिघाड दुरूस्त करणे शक्य होत नाही.

वाहनांच्या वेग मर्यादेवर नियंत्रण ठेवा

चामोर्शी : शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून त्या तुलनेत वाहनांची संख्याही वाढत आहे. मात्र अनेक वाहनधारक रस्त्यावरून सुसाट वेगाने वाहने चालवतात. अशा वाहनधारकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

अनेक गावे विहिरीच्या पाण्यावर अवलंबून

आलापल्ली : जिल्ह्यात पाणीपुरवठा योजनांची संख्या अत्यंत मर्यादित आहे. एकूण लोकसंख्येच्या केवळ १९.५० लोकसंख्याच नळाचे पाणी पिण्यासाठी वापरते. उर्वरित जनतेला विहीर, हातपंपाच्या पाण्याचा आधार घ्यावा लागतो. ग्रामपंचायतीच्या मार्फतीने नियमितपणे विहीर व हातपंपामध्ये ब्लिचिंग पावडर टाकली जात नाही. त्यामुळे सदर पाणी पिण्यायोग्य राहत नसल्याचे आढळून आले आहे.

खरपुंडी मार्गावर पथदिवे लावा

गडचिरोली : खरपुंडी मार्गावर डम्पिंग यार्डपर्यंत वीज तारा टाकून खांब गाडण्यात आले आहेत. मात्र या मार्गावर अजूनपर्यंत पथदिवे लावण्यात आले नाही. सकाळी अनेक नागरिक फिरण्यासाठी खरपुंडी मार्गावर जातात. या मार्गावर पथदिवे लावण्याची मागणी आहे.

अल्पवयीनांवर कारवाई करा

देसाईगंज : शहरातून मोठ्या प्रमाणात भरधाव वेगाने वाहने चालवली जात आहेत. मात्र याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे अपघातही घडलेले असून, भरधाव वेगाने वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आहे.

खासगी रुग्णालयात पार्किंगची वाणवा

गडचिराेली : शहरात मोठ्या प्रमाणात खासगी रुग्णालये आहेत. मात्र यातील बहुतांश रुग्णालयांमध्ये पार्किंगची व्यवस्था नाही. नगरपरिषदेने रुग्णालय प्रशासनावर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. सामान्य नागरिकांवर कारवाई करणारे नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला जात आहे.

सांडपाणी अडल्याने आरोग्य धोक्यात

आरमाेरी : तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्वच्छता मोहीम रखडल्याने नाल्या सांडपाण्याने भरल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामपंचायतने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.

जळाऊ लाकडाचा पुरेसा पुरवठा नाही

अहेरी : जंगल परिसरात असणारे ग्रामीण भागातील नागरिक स्वयंपाकासाठी जळाऊ लाकडांचा उपयोग करतात. पण, वन कायद्यामुळे अडचणी निर्माण झाल्या. हा प्रश्न सोडविण्याची मागणी तालुक्यातील नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे.

बीएसएनएलची सेवा ठरली कुचकामी

झिंगानूर : भारतीय दूरसंचार निगम लिमिटेडच्या वतीने सिराेंचा तालुक्याच्या झिंगानूर भागात दूरसंचार सेवा दिली जाते. मात्र गेल्या काही महिन्यापासून कव्हरेजची समस्या माेठ्या प्रमाणात निर्माण झाल्याने भ्रमणध्वनीधारकांचा एकमेकांशी संपर्क हाेत नाही. परिणामी बीएसएनएलची सेवा या भागात कुचकामी ठरली आहे.

लाईनमन नसल्याने ग्रामस्थांची अडचण

भामरागड : तालुक्यात आटाचक्की, सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना व कृषिपंपांना विद्युत पुरवठा करावा लागतो. यामुळे येथे कर्तव्यदक्ष लाईनमन असणे गरजेचे असते. परंतु अनेक गावांत लाईनमन नसल्याने विद्युतपुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष होत असते. तसेच एका लाईनमनकडे चार ते पाच गावे येत असल्यामुळे ते प्रत्येक गावी सारखा वेळ देऊ शकत नाहीत.

तुटलेले साईन बोर्ड दुरुस्तीची मागणी

सिराेंचा : तालुक्यातील मुख्य मार्गावर बऱ्याच ठिकाणी शहरातील स्थानाबाबत साईन बोर्ड लावण्यात आले आहे. मात्र ते अनेक ठिकाणी तुटले आहेत. त्याची त्वरित दुरुस्ती करावी. अनेक फलकावर लिहिलेली अक्षरे मिटल्याने अडचण जाते. त्यामुळे गावाचे नाव अंकित करावे, अशी मागणी होत आहे.

घरपट्टे मिळण्यास हाेत आहे विलंब

गडचिरोली : शहरात गोकुलनगर, रामनगर, इंदिरानगर, विवेकानंदनगर, या परिसरात अतिक्रमण करून हजारो कुटुंब वास्तव्यास आहेत. मात्र अद्यापही जागेचे पट्टे देण्यात आले नाहीत. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घर बांधकामासाठी स्वत:च्या मालकीची जागा असणे गरजेचे आहे.

फळांच्या दुकानांची तपासणी करा

वैरागड : विविध प्रकारची फळे कृत्रिमरित्या कॅल्शिअम कार्बाईडने पिकविली जात असून अशा फळांची गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आयात होत आहे. असे फळ खाल्ल्यामुळे आरोग्य धोक्यात येत आहे. पाण्याने धुऊन तसेच कपड्याने पुसून ताजे फळ असल्याचे भासवून अनेकजण त्याची विक्री करीत आहेत.

कार्यालयातील बायोमेट्रिक मशीन बंद

धानोरा : शासकीय कार्यालयात कर्मचारी, अधिकारी नियमित वेळी उपस्थित राहावेत, याकरिता अनेक कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक मशीन बसविण्यात आलेल्या आहेत. अनेक कार्यालयांतील मशीन बंद आहेत.

कोटगूल येथे आयटीआय मंजूर करा

कोरची : कोटगूल येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था मंजूर करून या भागातील विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक शिक्षणाची सुविधा निर्माण करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. व्यावसायिक शिक्षणाला महत्त्व आहे. मात्र, शासनाच्या चुकीच्या धाेरणाने या शिक्षणाची वाट लागली आहे.

पर्जन्यमापक वास्तूची दुरुस्ती करा

सिरोंचा : ब्रिटिशकालीन सत्ताकाळात सिरोंचा तालुका मुख्यालयी हवामान खात्याच्या अखत्यारित असलेल्या पर्जन्यमापक वास्तूची दुरवस्था झाली आहे. पूर्णत: दगडाने बांधण्यात आलेल्या या वास्तूची दुरुस्ती करावी, अशी मागणी आहे. नदीच्या काठावर असलेल्या सिरोंचा शहराला इंग्रज कालावधीपासून महत्व आहे.

डास व किटकांपासून आरोग्य धोक्यात

गडचिरोली : शहरातील बहुतांश वाॅर्डातील नाल्या कचरा व सांडपाण्याने तुडुंब भरल्या आहेत. ओपन स्पेसही कचऱ्याचे केंद्र बनले आहे. परिणामी डास व किटकांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे प्रत्येक वॉर्डातील नाल्या तसेच डबक्यांमध्ये फवारणी करावी, अशी मागणी आहे.

वनहक्क प्रकरणे रखडली

सिरोंचा : वनहक्क कायद्यानुसार वनजमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीला शासनाकडून वनहक्क प्रदान केला जातो. मात्र गडचिरोली जिल्ह्यात हजारो नागरिकांना अजूनही वनपट्टे प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे नागरिक कार्यालयांचे उंबरठे झिजवित आहेत.

राजोलीत अर्धवट पुलावरून प्रवास

धानोरा : तालुक्यातील राजोली गावाजवळच्या कठाणी नदीवर पाच वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पूल दोन वर्षापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे रपट्यासह वाहून गेला. दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात या गावातील विद्यार्थी व नागरिकांना पुलाअभावी नवरगावमार्गे अधिकचे १५ किमी अंतर कापून धानोरा तालुका मुख्यालय व गडचिरोली मुख्यालय गाठावे लागते.

कुरखेडा येथे पार्किंगची व्यवस्था करा

कुरखेडा : शहरातील मुख्य चौकात पार्किंगची व्यवस्था नाही. त्यामुळे नागरिक रस्त्यावरच वाहने ठेवतात. त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होत असून अपघाताची शक्यताही वाढली आहे. पार्किंगची व्यवस्था नसल्याने दुकानात येणारे ग्राहक रस्त्यावरच वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो.

पशुखाद्यांच्या किमतीत भरमसाठ वाढ

आलापल्ली : दुभत्या व कष्टाचे काम करणाऱ्या जनावरांना सरकी, ढेप, कडधान्यांचा कोंडा चारल्या जातो. यामुळे जनावर सुदृढ राहून दूध जास्त देते. वाढत्या महागाईचा फटका पशुखाद्यांनाही बसला आहे. पशुखाद्यांच्या किमती जवळपास १० टक्क्यांनी वाढल्या आहेत.

Web Title: Mobile service disrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.