नव्या सरकारात जिल्ह्यात मंत्र्यांचे दौरे वाढले
By Admin | Updated: February 3, 2015 22:54 IST2015-02-03T22:54:57+5:302015-02-03T22:54:57+5:30
नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे गडचिरोली जिल्ह्यात मंत्र्यांचे दौरे होण्यास गृह विभागाची नेहमीच आडकाठी राहत होती. अनेकदा नियोजित दौरेही रद्द करावे लागल्याच्या घटना येथे घडल्या.

नव्या सरकारात जिल्ह्यात मंत्र्यांचे दौरे वाढले
गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे गडचिरोली जिल्ह्यात मंत्र्यांचे दौरे होण्यास गृह विभागाची नेहमीच आडकाठी राहत होती. अनेकदा नियोजित दौरेही रद्द करावे लागल्याच्या घटना येथे घडल्या. मात्र राज्यात सत्तांतरण होताच मंत्र्यांच्या दौऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
आॅक्टोबर महिन्यात राज्यात सत्तांतरण झाल्यानंतर २४ नोव्हेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली येथे दौरा केला. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यानंतर डिसेंबर महिन्यात नागपूर अधिवेशनादरम्यान गृह राज्यमंत्री (ग्रामीण) प्रा. राम शिंदे यांनी गडचिरोली जिल्हा मुख्यालयाला भेट देऊन पोलीस विभागाच्या अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली. त्यांच्या उपस्थितीत नक्षलपिडीत कुटुंबाना मदत देण्यात आली. आत्मसमर्पीत नक्षलवादी गोपी याच्याशीही त्यांनी संवाद साधला. राज्याचे वित्त व नियोजन, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १२ जानेवारी रोजी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी आढावा बैठक घेऊन अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. तत्पूर्वी त्यांनी चामोर्शी तालुका मुख्यालयालाही भेट देऊन येथे पक्षीय व सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावली. नुकतीच शिवसेनेचे सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला. वडसा, आरमोरी, गडचिरोली येथे त्यांनी कार्यक्रम घेतले. आढावा बैठक घेऊन अधिकाऱ्यांनाही मार्गदर्शन केले. तसेच राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनीही जिल्ह्यात आष्टी, आरमोरी येथे पक्ष कार्यक्रमाला हजेरी लावली.
नव्या सरकारच्या काळात मंत्र्यांच्या दौऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अनेकदा मंत्री दुर्गम भागात दौरे करण्यासाठी धजावत होते. परंतु सध्या दुर्गम भागातही मंत्री जाऊ लागले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री व आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी तर संपूर्ण जिल्हा पिंजून काढण्यास सुरूवात केली आहे. सिरोंचापासून कोरचीपर्यंत अवघ्या एक ते दीड महिन्यांच्या काळात त्यांनी दौरे करून या भागातील लोकांचे प्रश्न जाणून घेतले. बऱ्याच वर्षांनंतर कोरची तालुक्यातील मुख्यालयातील पोलीस ठाण्याचे उद्घाटन अम्ब्रीशराव महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. कुरखेडा येथेही पोलीस ठाण्याचे उद्घाटन त्यांनी केले.