अनेक ग्रामपंचायतीत ग्रामसभा झाली नाही
By Admin | Updated: August 25, 2016 01:02 IST2016-08-25T01:02:09+5:302016-08-25T01:02:09+5:30
१५ आॅगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहनानंतर प्रत्येक ग्रामपंचायतीत ग्रामसभा घेऊन गाव विकासाबाबत

अनेक ग्रामपंचायतीत ग्रामसभा झाली नाही
कोरमचा अभाव : ग्रामीण, दुर्गम भागातील लोकांची अनास्था
गडचिरोली : १५ आॅगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहनानंतर प्रत्येक ग्रामपंचायतीत ग्रामसभा घेऊन गाव विकासाबाबत चर्चा करून ठोस निर्णय घेण्यात यावे, असे निर्देश राज्याच्या ग्रामविकास विभागाने प्रशासनाला दिले होते. मात्र जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात गाव विकासाबाबत प्रचंड उदासीनता असल्याने कोरमअभावी जिल्ह्यातील १०० वर ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभाच झाली नसल्याची माहिती पुढे आली आहे.
१५ आॅगस्टच्या ग्रामसभेत ११ विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या विषयांचा सूचीमध्ये समावेश करण्यात आला होता. यामध्ये बालकल्याण विभागाअंतर्गत ज्या अंगणवाडी केंद्रांना इमारत नसेल, त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देणे तसेच जीर्ण झालेल्या अंगणवाडी इमारतीचे निर्लेखन करण्याचे प्रस्ताव तयार करावे, प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना, कृषी विभागाअंतर्गत आदिवासी उपययोजना, अनुसूचित जाती उपययोजनेच्या लाभार्थ्यांची निवड करणे, मामा तलाव दुरूस्ती तसेच कोल्हापुरी साठवण बंधाऱ्याचे बांधकाम करणे, दुरूस्ती करणे आदी विषय ठेवून त्यास ग्रामसभेची मंजुरी प्रदान करावी आदी बाबींचा समावेश होता. याशिवाय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, पाणीपुरवठा योजना, मुलींना सायकल वाटप, मनरेगाच्या कामाचा आराखड्याला मंजुरी देणे, निर्मल भारत अभियानातून शौचालयाची कामे तसेच समाजकल्याण विभागाच्या विविध योजनांच्या कार्यवाहीला मंजुरी देण्याचा विशेष सूचीमध्ये समावेश होता.
गावाचा विकास आराखड्याला मंजुरी प्रदान करण्याचा महत्त्वाचा अधिकार ग्रामसभेला शासनाने प्रदान केला आहे. मात्र अनेक गावात काही मोजक्याच पदाधिकाऱ्यांची मर्जी विकास कामात खपवून घेतली जाते. त्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील अनेक मतदार ग्रामसभेकडे पाठ फिरवित असल्याचे यानिमित्ताने दिसून येत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)