अनेक उमेदवारांचा पैसा गेला पाण्यात

By Admin | Updated: April 25, 2015 01:41 IST2015-04-25T01:41:36+5:302015-04-25T01:41:36+5:30

स्थानिक स्वराज्य संस्थेतील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे, ग्रामपंचायत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी अनेक उमेदवारांनी नामांकन पत्र दाखल करून प्रचारही पूर्ण केला.

Many candidates have lost their money in water | अनेक उमेदवारांचा पैसा गेला पाण्यात

अनेक उमेदवारांचा पैसा गेला पाण्यात

गडचिरोली : स्थानिक स्वराज्य संस्थेतील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे, ग्रामपंचायत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी अनेक उमेदवारांनी नामांकन पत्र दाखल करून प्रचारही पूर्ण केला. मात्र मतदानाच्या आदल्या रात्री शासनाने नगर पंचायती स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याने या ग्रामपंचायतसाठीचे मतदान रद्द करण्यात आले. त्यामुळे अनेक उमेदवारांना लाखो रूपयाने चुना लागल्याचे चित्र जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यांमध्ये दिसून येत आहे. शुक्रवारी मतदान असल्याने गुरूवारच्या रात्री अनेक तालुका मुख्यालयाच्या ग्रामपंचायतीसाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांनी आपल्या पेट्या खुल्या केल्या होत्या व मतदारांना पैसे वाटण्याचे कामही कार्यकर्त्यांमार्फत सुरू केले होते. मात्र रात्री उशिरा जिल्हा प्रशासनाला ग्रामीण विकास मंत्रालयाकडून गडचिरोली जिल्ह्यात १० ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रूपांतर करण्यात आले असल्याचा आदेश प्राप्त झाला व या ग्रामपंचायतीच्या निवडणुका रद्द झाल्या. एटापल्ली, सिरोंचा, अहेरी आदी तालुका मुख्यालयात मतदानासाठी गेलेले पोलिंग पथकही परत आले. सरकारच्या या आदेशामुळे अनेक उमेदवार आर्थिक अडचणीत आले आहे. पहिल्या टप्प्यात सिरोंचा रै., सिरोंचा माल, अहेरी, एटापल्ली या तालुका मुख्यालयाच्या ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द करण्यात आली तर दुसऱ्या टप्प्यात कोरची, कुरखेडा, धानोरा, आरमोरी, चामोर्शी, मुलचेरा या तालुका मुख्यालयाची निवडणूक रद्द झाली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

एटापल्लीत रात्री साडेअकराला पोहोचली बातमी
एटापल्ली तालुका मुख्यालयाच्या १७ सदस्यीय ग्रामपंचायतीच्या १४ जागांवर २४ एप्रिलला मतदान होणार होते. ५० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याने निवडणुकीचा प्रचार अत्यंत चुरशीचा झाला. मात्र शुक्रवारी मतदान होणार असल्याने गुरूवारी रात्रीपासूनच सर्व उमेदवारांनी सर्व वार्डांवर आपले लक्ष केंद्रीत केले होते. गुरूवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास तहसील कार्यालयाला एटापल्ली ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द करण्यात आली आहे, अशी सूचना आली अन् उमेदवारांची तारांबळ उडाली. नामांकन पत्र दाखल केल्यापासून ते मतदानाच्या आदल्या रात्रीपर्यंत हजारो रूपयांचा खर्च या ५० उमेदवारांनी केला. त्यांच्या सर्वांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले, अशीच परिस्थिती चामोर्शी याही तालुका मुख्यालयात दिसून आली. येथे दोन उमेदवार ग्रामपंचायतसाठी अविरोध निवडून आले होते. इतर जागांवर मोठी चुरस होती. अनेक दिग्गजांनी येथे प्रचार यंत्रणा राबविली. मात्र त्यांच्याही पदरी या निर्णयाने निराशा आली आहे. एकूणच आनंदापेक्षा दु:खाचे वातावरण तालुका मुख्यालयांमध्ये दिसून आले.

Web Title: Many candidates have lost their money in water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.