कोतवाल भरतीत महिलाराज
By Admin | Updated: July 3, 2014 23:34 IST2014-07-03T23:34:17+5:302014-07-03T23:34:17+5:30
नक्षल्यांच्या दहशतीने एटापल्ली तालुक्यातील बहुतांश गावातील नागरिक पोलीस पाटील, कोतवाल व ग्रामपंचायत सदस्यपदांची जबाबदारी स्विकारण्यास तयार नाही. मात्र याच तालुक्यातील पाच गावातील

कोतवाल भरतीत महिलाराज
जिल्ह्यातील पहिल्या कोतवाल : पाच महिलांची कोतवालपदी नियुक्ती
रवी रामगुंडेवार - एटापल्ली
नक्षल्यांच्या दहशतीने एटापल्ली तालुक्यातील बहुतांश गावातील नागरिक पोलीस पाटील, कोतवाल व ग्रामपंचायत सदस्यपदांची जबाबदारी स्विकारण्यास तयार नाही. मात्र याच तालुक्यातील पाच गावातील महिला दहशतीची बंधने झुगारत पुढे आल्या. कोतवालपदी नियुक्ती झाल्यानंतर मनात कोणतीही भीती न बाळगता जबाबदारी स्विकारली आहे. त्यांच्या या ध्यैर्याची एटापल्ली तालुक्यात चांगलीच चर्चा होत आहे.
संपूर्ण गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त आहे. मात्र छत्तीसगड राज्याला लागून असलेल्या कोरची, धानोरा, एटापल्ली, भामरागड या तालुक्यांमध्ये नक्षल्यांची दहशत अधिकच आढळून येते. दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील अधिकांश गावांचा कारभार नक्षल्यांनी बनविलेल्या नियमांच्या आधारावर चालतो. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्याला नक्षली दहशतीचा सामना करावा लागतो. या भागात आपली दहशत कायम राहावी, यासाठी या गावांपर्यंत प्रशासनाच्या योजना व प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी पोहोचू नयेत यासाठी नक्षल्यांकडून नेहमीच चाल खेळली जाते. याअंतर्गतच महिन्यातून एखाद्या ग्रामपंचायत सदस्यावर, कोतवालावर, पोलीस पाटलावर किंवा सामान्य नागरिकावर पोलीस खबऱ्या असल्याचा आरोप लावून त्याचा खून केला जातो.
नक्षल्यांच्या या दहशतीमुळे याठिकाणी प्रशासनाचे अधिकारी किंवा शासनाचे पदाधिकारी म्हणून कोणीच काम करण्यास तयार नाही. याचा परिणाम म्हणजे एटापल्ली तालुक्यातील दुर्गम भागातील गावांमधील ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, कोतवाल पदाची अनेक पदे रिक्त आहेत. नक्षल्यांच्या या दहशतीमुळे युवकवर्ग व नागरिक नोकरी करण्यास तयार नसतांना पाच गावातील युवतींनी मात्र हिंमत बांधली.
एटापल्ली तालुक्यात ८१ पदासाठी कोतवाल भरती घेण्यात आली. या भरतीत ३३ पेक्षा अधिक महिला उमेदवारांनी अर्ज केले. त्यापैकी उडेरा येथील राजेश्वरी लक्ष्मीकांत शिवरकर, बुर्गी येथील अस्मिता लक्ष्मण दुर्गे, गट्टा येथील निता मंगू नवडी, कसनसूर येथील रूपाली मारोती सुरपाम, घोटसूर येथील जयश्री माधव गड्डमवार या पाच महिलांची निवड झाली. हे पाचही गाव नक्षलग्रस्त आहेत. तालुक्यात प्रथमच महिला कोतवाल झाल्याबद्दल पाचही जणींचा तहसीलदार यू. जी. वैद्य यांनी तहसील कार्यालयात कार्यक्रम घेऊन त्यांचा सत्कार केला. सत्कारानंतर नवनियुक्त कोतवालांची बैठक घेऊन तहसीलदारांनी त्यांना कामाचे स्वरूप पटवून दिले. युवकांच्या बरोबरीचे शिक्षण घेऊन देशभरातील महिला प्रत्येक क्षेत्रात आपले नाव कमावित आहेत. यात गडचिरोलीच्या दुर्गम भागात राहणाऱ्या युवतीही मागे नाही. त्यासुद्धा पुरूषाच्या बरोबरीने काम करू शकतात, हे दाखवून दिले आहे. समस्यांचे तुणतुणे वाजवत बसण्यापेक्षा त्यातून मार्ग कसा काढावा हे इतर युवतींनी शिकण्याची गरज आहे.