Maharashtra Election 2019 ; दारूमुक्त निवडणुकीसाठी गावे सरसावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 06:00 IST2019-10-07T06:00:00+5:302019-10-07T06:00:37+5:30
गडचिरोली जिल्ह्यात २२ वर्षांपासून कायद्याने दारूबंदी आहे. गेल्या तीन वर्षापासून ‘मुक्तिपथ’ अभियान सुरू आहे. त्या अंतर्गत व्यापक कार्यक्रमातून गडचिरोली जिल्हा दारू व तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. आतापर्यंत ६०० गावांनी सामूहिक निर्णयाने आपल्या गावातील दारू विक्री बंद करून ठेवली आहे.

Maharashtra Election 2019 ; दारूमुक्त निवडणुकीसाठी गावे सरसावली
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : विधानसभा निवडणूक दारूमुक्त करण्यासाठी मुक्तिपथ गाव संघटनांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. २८७ गावांच्या १२० ग्रामपंचायतींनी निवडणूक दारूमुक्त करण्याचा ठराव ग्रामसभांमध्ये घेतला आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत निवडणूक दारूमुक्त करण्यासाठी अनेक गावांनी पुढाकार घेतला आहे. रॅली काढून जनजागृती केली जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यात २२ वर्षांपासून कायद्याने दारूबंदी आहे. गेल्या तीन वर्षापासून ‘मुक्तिपथ’ अभियान सुरू आहे. त्या अंतर्गत व्यापक कार्यक्रमातून गडचिरोली जिल्हा दारू व तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. आतापर्यंत ६०० गावांनी सामूहिक निर्णयाने आपल्या गावातील दारू विक्री बंद करून ठेवली आहे. निवडणूक काळात लोकांना दारूचे आमिष देऊन त्यांचे अमूल्य मत विकत घेण्याचा प्रकार बरेचदा घडतो. गडचिरोली जिल्हाही याला अपवाद नाही. असे झाल्यास गावांनी परिश्रमाने टिकवून ठेवलेली दारूबंदी निकामी ठरते. त्यामुळे गावातील दारूबंदी टिकवून ठेवण्यासाठी विधानसभा निवडणूक दारूमुक्त करण्याचा निर्धार अनेक गावे करीत आहेत. सिरोंचा तालुक्यातील जंगलपल्ली, बालमुत्यमपल्ली, गोलगुडम चेक, ग्लासफोर्डपेठा, तुमनूरमाल, रामंजापूर, एटापल्ली तालुक्यातील चंदनवेली, दोड्डी, तोडसा, कुरखेडा तालुक्यातील गरगडा, खेरी, खेडगाव (गवळीटोला) आदी गावांनी गावात सभा घेऊन दारुमुक्त निवडणुकीचा निर्धार केला. निवडणूक काळात गावात दारूचा वापर करणार नाही, वापर होऊ देणार नाही, दारूचा वापर होताना दिसल्यास तत्काळ कारवाई करण्याचा निर्णय लोकांनी घेतला.
दारू पाजणाऱ्या उमेदवारांना मत विकू नका
लोकशाही बळकट करण्यासाठी दारूमुक्त निवडणूक पार पाडणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. याची जाणीव गावांना व्हावी, यासाठी सिरोंचा तालुक्यातील गोलगुडम, एटापल्ली तालुक्यातील तोडसा, जीवनगट्टा तर आरमोरी तालुक्यातील कोटेगाव, पळसगाव तर कुरखेडा तालुक्यातील खेडगाव येथील गाव संघटनांनी रॅली काढून जनजागृती केली. ज्याला दारूबंदी नको, तो आमदार आम्हाला नको, दोन पैशाची दारू घेऊन आपले अमूल्य मत देऊ नका, ‘जो पाजील माझ्या नवºयाला दारू त्या उमेदवारला नक्कीच पाडू’ आशा घोषणा गाव संघटनांनी दिल्या.