कर्मचाऱ्यांचा मुख्यालयाला खो
By Admin | Updated: January 7, 2015 22:53 IST2015-01-07T22:53:13+5:302015-01-07T22:53:13+5:30
राज्य शासनाने शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश दिले आहेत. त्याची पूर्तता करण्यासाठी कर्तव्याच्या ठिकाणी त्यांना निवासस्थानही उलपब्ध करण्यात आले आहेत.

कर्मचाऱ्यांचा मुख्यालयाला खो
देसाईगंज : राज्य शासनाने शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश दिले आहेत. त्याची पूर्तता करण्यासाठी कर्तव्याच्या ठिकाणी त्यांना निवासस्थानही उलपब्ध करण्यात आले आहेत. निवासस्थान नसले तर शासनातर्फे घरभाडेही मंजूर केले जाते. मात्र देसाईगंज तालुक्यातील विविध विभागातील कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याचे चित्र आहे.
वैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवक, शिक्षक, कृषी सहाय्यक, तलाठी, लाईनमन आदी तालुका अथवा जिल्हा मुख्यालयातून नियमित ये- जा करतात. या कर्मचाऱ्यांना शासनाच्यावतीने देसाईगंज व संबंधीत गावांमध्ये शासकीय निवासस्थान उपलब्ध करून देण्यात आले आहे. ज्या कर्मचाऱ्यांना निवासस्थान नाही, अशांना घरभाडे तसेच १५ टक्के प्रोत्साहनभत्ता लागू करण्यात आला आहे. मात्र मुख्यालयी न राहताही अनेक कर्मचारी या सोयी-सुविधेचा लाभ घेत आहेत. परिणामी अनेक कार्यालयातील कामांचा भार त्यांच्या कनिष्ठ साहयकांवर पडत आहे. हे कर्मचारी आपापल्या गावांहून ये- जा करतात. ते मुख्यालयी राहत असल्याचा देखावा करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात भाड्याचे घर वरिष्ठांना दाखवितात. ग्रामसेवकांप्रमाणे लाईनमनही मुख्यालयी राहत नाही, तर नातलग अथवा जवळचे संबंध असलेल्या व्यक्तींच्या घरी केवळ नावाची पाटी लावतात.