पुंजणे जळालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार
By Admin | Updated: February 8, 2015 23:47 IST2015-02-08T23:47:38+5:302015-02-08T23:47:38+5:30
जिल्ह्यात दरवर्षी धानाचे पुंजने जळून अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. मात्र अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे वर्षभराचे कष्ट मातीत मिसळते.

पुंजणे जळालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार
चामोर्शी : जिल्ह्यात दरवर्षी धानाचे पुंजने जळून अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. मात्र अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे वर्षभराचे कष्ट मातीत मिसळते. पुंजने जळालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई दिली जाईल, असे आश्वासन आ. डॉ. देवराव होळी यांनी गौरीपूर येथील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले.
वर्षभर शेतात राबून शेतकरी धानाची लागवड करतो. यासाठी अनेकांना बँक व बचत गटांकडून कर्ज काढावे लागते. मात्र धान पिकाची कामणी झाल्यानंतर काही असामाजिक तत्त्वांकडून पुंजन्याला आग लावली जाते. अशा अनेक घटना यंदाच्या खरीप हंगामात घडल्या आहेत.
गौरीपूर येथील शेतकरी हरीदास मनमोहन हवालदार यांच्या पुंजन्याला अज्ञात इसमांनी आग लावून जाळले. त्यांना व इतर शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून गौरीपूर भाजप शाखेचे प्रमुख अशीम मुखर्जी यांनी भाजप बंगाली आघाडीच्या शिष्ट मंडळाच्या वतीने होळी यांना निवेदन देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. यावेळी होळी यांनी राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, जिल्हाधिकारी यांच्याकडे विशेष निधीतून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करू असे आश्वासन दिले. यावेळी महानंद मंडल, हरीदास मंडल, रमेश अधिकारी, शक्ती मंडल उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)