वर्षाच्या शेवटच्या दिवशी बँकांमध्ये उसळली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 05:00 IST2020-04-01T05:00:00+5:302020-04-01T05:00:43+5:30
एटीएमच्या माध्यमातूनच पैसे काढले जात होते. त्यामुळे लॉकडाऊन केल्यापासून बँकांमध्ये फारशी गर्दी दिसून येत नव्हती. मात्र ३१ मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने पैसे भरण्यासाठी व बँकेची विविध कामे करण्यासाठी ग्राहकांची बँकेत गर्दी उसळली होती. गडचिरोली शहरातील सर्वच बँकांमध्ये ग्राहकांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या.

वर्षाच्या शेवटच्या दिवशी बँकांमध्ये उसळली गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : लॉकडाऊन झाल्यापासून बँकांमधील गर्दी ओसरली होती. मात्र ३१ मार्च आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने बँकेचे विविध व्यवहार करण्यासाठी गडचिरोली शहरातील बँकांमध्ये गर्दी उसळली होती.
कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी बँकांसाठी रिझर्व बँकेने काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये ग्राहकांना बँकेमध्ये प्रवेश देतेवेळी सोशल डिस्टन्स ठेवावे. त्यासाठी संपूर्ण ग्राहकांना बँकेत जाऊ न देता दोन ते तीनच ग्राहकांना एकावेळी बँकेत जाऊ दिले जात आहे. ग्राहकांची बाहेरच रांग लागत असल्याने अनेकांनी बँकेत जाणे बंद केले होते.
एटीएमच्या माध्यमातूनच पैसे काढले जात होते. त्यामुळे लॉकडाऊन केल्यापासून बँकांमध्ये फारशी गर्दी दिसून येत नव्हती. मात्र ३१ मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने पैसे भरण्यासाठी व बँकेची विविध कामे करण्यासाठी ग्राहकांची बँकेत गर्दी उसळली होती. गडचिरोली शहरातील सर्वच बँकांमध्ये ग्राहकांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या. सद्य:स्थितीत बँकेची वेळ सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे.
गडचिरोली शहरातील बँक आॅफ इंडिया शाखेला लोकप्रतिनिधीने भेट दिली असता, बँकेच्या बाहेर उभे असलेले ग्राहक सोशल डिस्टन्सचा पालन करीत नसल्याचे दिसून आले. काही निवडकच ग्राहकांनी मास्क घातला होता. बँकेच्या आतमध्ये मात्र सोशल डिस्टन्स ठेवूनच ग्राहकांची कामे केली जात होती.कार्यालयात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला सॅनिटायझरने हात स्वच्छ करणे सक्तीचे करण्यात आले होते. वरिष्ठ कार्यालयाच्या निर्देशानुसार बँक इंडियामध्ये केवळ ५० टक्केच कर्मचारी उपस्थित होते.
निवडक कामांमुळे कामावर मर्यादा
बँकांमध्ये गर्दी उसळू नये, यासाठी बँकांनी काही निवडकच कामे करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार रोकड भरणे, काढणे, चेक क्लिअर करणे, आरटीजीएस, नेफ्ट करणे व शासनाची कामे एवढीच कामे केली जात आहेत. इतर सर्व कामे ठप्प असल्याने पूर्वीच्या तुलनेत बँकांमध्ये फारशी गर्दी होत नसल्याचे दिसून येत आहे.