..अखेर निर्वाह भत्त्याचा तिढा सुटला

By Admin | Updated: December 18, 2014 22:54 IST2014-12-18T22:54:36+5:302014-12-18T22:54:36+5:30

सत्र सुरू होऊन पाच महिन्यांचा कालावधी लोटूनसुद्धा गडचिरोली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्त्याचे वितरण केले नव्हते.

At last, the allowance allowance was released | ..अखेर निर्वाह भत्त्याचा तिढा सुटला

..अखेर निर्वाह भत्त्याचा तिढा सुटला

गडचिरोली : सत्र सुरू होऊन पाच महिन्यांचा कालावधी लोटूनसुद्धा गडचिरोली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्त्याचे वितरण केले नव्हते. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी ६ डिसेंबर रोजी प्रकल्प कार्यालयावर धडक दिली. त्यानंतर प्रशासनाने गतीने पाऊले उचलत सर्वच विद्यार्थ्यांचा निर्वाहभत्ता वितरीत केला आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण व दुर्गम भागात आश्रमशाळा चालविल्या जातात. या आश्रमशाळांमध्ये १ ते १२ पर्यंतच्या शिक्षणाची सुविधा राहते. यासर्व आश्रमशाळा निवासी स्वरूपाच्या राहत असल्याने येथील विद्यार्थ्यांना भोजनाचीही व्यवस्था केली जाते. मात्र काही विद्यार्थी तालुका किंवा जिल्हास्थळी राहून तेथील शाळा, महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय व्हावी, यासाठी गडचिरोली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात २१ वसतिगृह सुरू केले आहेत. यामध्ये गडचिरोली शहरात ३, धानोरा, आरमोरी, देसाईगंज, कोरची, कुरखेडा, चामोर्शी या प्रत्येक तालुकास्थळी २ याप्रमाणे १२ वसतिगृह, याशिवाय कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा, धानोरा तालुक्यातील मोहली, चातगाव व चामोर्शी तालुक्यातील घोट येथे प्रत्येकी एक व आष्टी येथे २ वसतिगृह, असे एकूण २१ वसतिगृह आहेत. या वसतिगृहांमध्ये २ हजार ४३५ विद्यार्थी राहत आहेत.
वसतिगृहातील विद्यार्थ्यांना भोजन पुरविण्यासाठी कंत्राट देण्यात आले असून प्रत्येक विद्यार्थ्यामागे सरासरी महिन्याचे ३ हजार २०० रूपये आदिवासी विकास विभागाच्या मार्फतीने कंत्राटदाराला दिले जातात. वसतिगृहातील विद्यार्थी काही वेळेला शाळा सुरू असताना आईवडिलांना भेटण्यासाठी जातात. त्यावेळी सदर विद्यार्थ्याची अनुपस्थिती दाखविणे आवश्यक आहे. मात्र गृहपालाच्या संगणमताने कंत्राटदार सर्वच विद्यार्थ्यांची हजेरी लावून भोजनाचे पूर्ण पैसे उचलत होते. हा गैरप्रकार प्रकल्प अधिकारी शिवशंकर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रत्येक वसतिगृहात थम्ब मशीन बसविली व थम्ब मशीनवरीलच हजेरी ग्राह्य धरली जाईल, असे निर्देश दिले. थम्ब मशीनमुळे आजपर्यंत सुरू असलेल्या गैरव्यवहाराला मोठ्या प्रमाणात चाप बसला. विद्यार्थ्यांची हजेरी कमी झाली. त्यामुळे भोजन कंत्राटदारांचे व गृहपालांचे डोके गरम होण्याला सुरूवात झाली. परिणामी अनेक दिवस विद्यार्थ्यांची हजेरी व जेवणाचे बिल प्रकल्प कार्यालयात पाठविण्यात आले नाही. त्यामुळे प्रकल्प कार्यालयाने निर्वाहभत्ता वितरीत केला नाही व भोजनाचे बिल कंत्राटदारांना दिले नाही. प्रकल्प अधिकाऱ्यांवर दबाव निर्माण करून थम्ब मशीनची पद्धत बंद करण्याच्या उद्देशाने कंत्राटदारांनी भोजनाचे बिल न मिळाल्याचे सोंग करीत विद्यार्थ्यांना हाताशी धरून आंदोलन केले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे नमते घेत प्रकल्प अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराचे बिल देण्याबरोबरच सर्वच विद्यार्थ्यांचा आॅक्टोबर २०१४ पर्यंतचा निर्वाहभत्ता वितरीत केला आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: At last, the allowance allowance was released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.