याबाबत येथील काही जागरूक नागरिकांनी नगरपंचायतच्या मुख्याधिकारी नमिता बांगर यांच्याकडे विचारणा केली असता २६ जानेवारी व १५ ऑगस्टलाच देशभक्ती उफाळून येते का? नगरातील १० झेंडे फडकले नाही तर कोणता असा फरक पडला? असे उलट सुनावल्याचे सदर नागरिकांनी वरिष्ठांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. नगर पंचायतचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी समाधान शेंडगे यांनीही काही ऐकून न घेता हा विषय येथेच थांबवा, असे म्हणत प्रकरणावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतप्त नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण न करणाऱ्या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ईश्वर ठाकरे, अनिकेत आकरे, मुकेश माकडे, एजाज शेख, तलत सय्यद, भावेश मुंगणकर, चेतन मडावी, साईनाथ कोंडावर व युवकांनी दिला आहे.
याबाबत माजी प्रभारी नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे यांच्याशी संपर्क साधला असता प्रजासत्ताक दिनाच्या नियोजनासंदर्भात पाच दिवसांपूर्वी मुख्याधिकाऱ्यांची भेट होऊ शकली नाही. प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचित करून नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समितीच्या सभापतींना विश्वासात घेऊन शहरातील ध्वजारोहण कार्यक्रम करण्यास सांगितले होते. मात्र सूचनेची दखल घेतली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
(बॉक्स)
अधिकारी निरूत्तर
दरम्यान या प्रकरणाबाबत अधिक जाणून घेण्यासाठी मुख्याधिकारी नमिता बांगर यांच्याकडे भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता त्यांनी कॉलच स्वीकारला नाही. त्यामुळे या प्रकरणात प्रशासनाने अशी भूमिका का घेतली हे कळू शकले नाही. पदाधिकारी, नागरिकांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला असता तर नागरिकांचा रोष ओढवला नसता, अशा प्रतिक्रिया सुज्ञ नागरिकांमधून उमटत आहेत.