श्रमदानातून पुलालगतचा रस्ता बांधला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 06:00 IST2019-11-29T06:00:00+5:302019-11-29T06:00:31+5:30
मात्र गावकऱ्यांनी तयार केलेला रस्ता पावसाळ्यापर्यंतच राहणार आहे. पावसाळ्यामध्ये नदीला पाणी आल्यानंतर सदर मार्ग नदीत वाहून जाते. या पुलाची ही दरवर्षीची समस्या बनली आहे. त्यामुळे पुलाचा विस्तार करणे आवश्यक आहे. मुख्य मार्गापासून राजोलीपर्यंतचा मार्ग मार्च २०१८ मध्ये बांधण्यात आला होता. या मार्गाची देखभाल व दुरूस्ती करण्याची जबाबदारी २०२३ पर्यंत संबंधित ठेकेदाराची आहे.

श्रमदानातून पुलालगतचा रस्ता बांधला
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : तालुक्यातील राजोली नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाजवळचा रस्ता वाहून गेला. नागरिकांनी श्रमदानातून पुलापर्यंत रस्ता बांधला.
राजोली गावाला जाताना पडत असलेल्या नदीवर नागरिकांच्या मागणीनंतर शासनाने पूल बांधला. मात्र पुलाचे काम व्यवस्थित करण्यात आले नाही. काही दिवसांतच पुलाच्या बाजूची माती वाहून गेली. नदीचा विस्तार झाल्याने नदीच्या किनारा व पूल यांच्यामध्ये काही अंतर पडले. पुलाजवळचा भाग नदीत रूपांतर झाला आहे. त्यामुळे आता दरवर्षी पावसाळ्यात सदर पूल निकामी होते. पलिकडे जायचे असेल तर सर्वप्रथम नदीचे पाणी ओलांडावे लागते. त्यानंतर पूल येतो. मात्र उंच पुलावर चढणे अशक्य होते. पावसाळा संपल्यानंतर या मार्गावरून वाहतूक करणे शक्य होते. मात्र पुलाला जोडणारा रस्ता तयार करावा लागतो. दरवर्षीची ही समस्या आहे. प्रशासनाचे अधिकारी लक्ष देत नसल्याने गावकऱ्यांनी श्रमदानातून पुलापर्यंतचा रस्ता तयार केला. या रस्त्यावरून आता वाहतूक सुरू झाली आहे.
मात्र गावकऱ्यांनी तयार केलेला रस्ता पावसाळ्यापर्यंतच राहणार आहे. पावसाळ्यामध्ये नदीला पाणी आल्यानंतर सदर मार्ग नदीत वाहून जाते. या पुलाची ही दरवर्षीची समस्या बनली आहे. त्यामुळे पुलाचा विस्तार करणे आवश्यक आहे.
मुख्य मार्गापासून राजोलीपर्यंतचा मार्ग मार्च २०१८ मध्ये बांधण्यात आला होता. या मार्गाची देखभाल व दुरूस्ती करण्याची जबाबदारी २०२३ पर्यंत संबंधित ठेकेदाराची आहे. त्याकरिता निधी सुद्धा वाढवून दिला. मात्र या मार्गाची डागडुजी केली नाही. परिसरातील शेतकरी आता धान्य व इतर साहित्य धानोरा येथे आणत आहेत तसेच शालेय विद्यार्थी व इतर नागरिकांचीही या मार्गाने वर्दळ राहते.
रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. डांबर पूर्णपणे उखडून गेला आहे. रस्त्यावरची गिट्टी बाहेर निघाली आहे.
तालुक्यातील इतरही मार्गांची दुरवस्था
यावर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील बहुतांश डांबरी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक कमालीचे त्रस्त आहेत. पावसाळा संपला असल्याने आता बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरूवात करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा या मार्गावरून वाहतूक करणे उन्हाळ्यापर्यंत अशक्य होणार आहे. गावांमधील अंतर्गत रस्त्यांचीही वाट लागली असल्याचे दिसून येते.