घाणीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:33 IST2021-05-22T04:33:42+5:302021-05-22T04:33:42+5:30

गडचिरोली : शहरातील पोटेगाव मार्ग निसर्गरम्य परिसर म्हणून ओळखला जातो. या मार्गाने अनेक नागरिक फेरफटका मारण्यासाठी पहाटे व सायंकाळी ...

Kingdom of Dirt | घाणीचे साम्राज्य

घाणीचे साम्राज्य

गडचिरोली : शहरातील पोटेगाव मार्ग निसर्गरम्य परिसर म्हणून ओळखला जातो. या मार्गाने अनेक नागरिक फेरफटका मारण्यासाठी पहाटे व सायंकाळी जात असतात. परंतु, पोटेगाव रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी घाणीचे साम्राज्य आहे.

वीजखांब धोकादायक

आलापल्ली : अहेरी तालुक्यासह अनेक गावांत ठिकठिकाणी वाकलेले खांब असून, ताराही लोंबकळत आहेत. यामुळे धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी भीतीचे वातावरण कायम आहे. त्यामुळे वाकलेले वीजखांब व लोंबकळलेल्या तारा सुरळीत करण्याची मागणी आहे.

सुबाभूळ लागवडीसाठी अनुदान द्या

धानोरा : सुबाभूळ लागवडीकरिता शेतकऱ्यांना कृषी व वन विभागाने अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सुबाभूळ लागवडीतून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावे.

कचराकुंड्यांची संख्या वाढविण्याची मागणी

आरमोरी : शहरात दिवसेंदिवस घाणीचे साम्राज्य वाढत असून, प्रशासनाचे या समस्येकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे़ शहरातील अनेक अंतर्गत भागात नागरिकांना कचरा टाकण्यासाठी कचराकुंड्या नाहीत़, तेथे कुंड्या नव्याने ठेवण्यात याव्यात.

चातगावात कव्हरेज खंडित

धानोरा : तालुक्यातील चातगाव येथील मोबाईल टॉवर व्यवस्थित काम करीत नसल्याने कव्हरेज मिळत नाही. त्यामुळे चातगाव परिसरातील मोबाईलधारक त्रस्त झाले असून, टॉवर दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

निवासस्थाने निरूपयाेगी

आलापल्ली : शासनाने लाखो रुपये खर्च करून येथे कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधून घेतली. मात्र, शासकीय कर्मचारी या निवासस्थानांना ‘खो’ देत असल्याने कर्मचाऱ्यांना देखभालीअभावी ही निवासस्थाने ओसाड झाली आहेत. येथील अनेक वन कर्मचाऱ्यांच्या इमारती ओसाड दिसून येतात.

पथदिवे झाकाेळले

आष्टी : परिसरात बहुतांश गावांमधील पथदिव्यांसमोर झाडाच्या फांद्या आल्या आहेत. त्यामुळे पथदिव्यांचा प्रकाश रस्त्यावर पोहोचत नाही. काही पथदिवे वेलींनी झाकोळले आहेत. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पथदिव्यांसमोरील फांद्या तोडाव्यात, अशी मागणी आष्टी परिसरातील नागरिकांकडून हाेत आहे.

लघु सिंचन इमारत जीर्ण

अहेरी : उपविभागातील सहा तालुक्यांचा कारभार पाहणारे अहेरी येथील उपविभागीय लघु सिंचन जलसंधारण कार्यालयाला शासनाने इमारत बांधून दिली नाही. त्यामुळे या कार्यालयाचा कारभार भाड्याच्या खोलीतूनच चालविला जात आहे. याशिवाय अनेक कार्यालये दुसऱ्या इमारतींमधून चालविली जात आहेत.

शाैचालयांची दुरवस्था

आष्टी : शासकीय कार्यालयांच्या शौचालयात फार मोठी दुर्गंधी निर्माण झाली आहे. त्यामुळे या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना प्रचंड त्रास होत आहे. या शौचालयांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे. शौचालयांची स्वच्छता होत नसल्याने दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे.

भाकरोंडीत रस्ते खड्डेमय

भाकरोंडी : परिसरातील अनेक गावांतील रस्त्यांचे २० वर्षांपूर्वी बांधकाम करून डांबरीकरण करण्यात आले. परंतु या मार्गाची अद्यापही दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना आवागमन करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. आता डांबरीकरण उखडले आहे.

मालेवाडा भागात समस्या

कुरखेडा : कोरची व धानोरा या दुर्गम भागांना जोडणारा मालेवाडा परिसर आजही शासन व प्रशासनाच्या नजरेत दुर्लक्षित आहे. या भागात ५० किमीच्या परिसरात केवळ एकाच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भरवशावर आरोग्य सेवा आहे. आरोग्य सेवा सुधारण्याची मागणी आहे. परंतु, या मागणीकडे दुर्लक्ष हाेत आहे.

धोडराज मार्गावर खड्डे

भामरागड : भामरागडावरून धोडराज पाच किमी अंतरावर आहे. दरम्यानच्या मार्गावर खड्डे पडले आहेत. मागील सात वर्षांपासून या मार्गाची दुरुस्तीच करण्यात आली आहे. धोडराजवासीय भामरागड येथे शासकीय कामानिमित्त येतात. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. मागीलवर्षी या मार्गाच्या दुरवस्थेत भर पडली.

वाहतुकीस अडसर

कुरखेडा : कुरखेडा शहराच्या अनेक वॉर्डांतील अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले आहेत. वारंवार मागणी करूनही नगरपंचायत प्रशासन रस्ता दुरुस्तीच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

पशू विभागातील पदे रिक्त

एटापल्ली : पशुवैद्यकीय विभागात अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे जनावरांवर वेळीच उपचार होण्यास अडथळे निर्माण होत आहेत. अनेक पशुवैद्यकीय दवाखान्यांत कर्मचारी उपलब्ध नसल्याने शिपाईच कारभार सांभाळत आहेत. त्यामुळे पशू विभागातील रिक्त पदे लवकर भरावी, अशी मागणी हाेत आहे.

थ्री-जी सेवा नावापुरतीच

कुरुड : परिसरात बीएसएनएलच्यावतीने थ्री-जी सेवा देण्यात आली आहे. मात्र, ही थ्री-जी सेवा केवळ नावापुरतीच असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी बीएसएनएलची इंटरनेट स्पीड टू-जी सेवेप्रमाणे दिली जात आहे. नागरिकांकडून थ्री-जी सेवेचे पैसे घेतले जात असून, सेवा मात्र टू-जी प्रमाणे दिली जात आहे.

एटापल्लीत अतिक्रमण

एटापल्ली : शहरातील रस्त्यालगत तसेच मोकळ्या जागेत अनेकांनी पक्के अतिक्रमण केले आहे. मागील अनेक वर्षांपासून शासकीय जागेवर बस्तान आहे. जागा गिळंकृत करण्याचाच हा प्रकार आहे. स्थानिक प्रशासनाने पक्के अतिक्रमण काढण्याची गरज आहे. अतिक्रमण काढल्यास रहदारी सुरळीत हाेईल.

Web Title: Kingdom of Dirt