कठाणी लागला मार्गी; पर्लकोटाचा पूल कागदावरच
By Admin | Updated: June 5, 2015 01:40 IST2015-06-05T01:40:49+5:302015-06-05T01:40:49+5:30
भामरागड गावाजवळ आलापल्ली-भामरागड मार्गावर पर्लकोटा नदीचा ठेंगणा व अरूंद पूल उंच करण्याचे आश्वासन शासनाने २००६ पासून दिलेले आहे.

कठाणी लागला मार्गी; पर्लकोटाचा पूल कागदावरच
भामरागड : भामरागड गावाजवळ आलापल्ली-भामरागड मार्गावर पर्लकोटा नदीचा ठेंगणा व अरूंद पूल उंच करण्याचे आश्वासन शासनाने २००६ पासून दिलेले आहे. मात्र गडचिरोली लगतच्या कठाणी नदीवरील पुलाचे काम सुरू करण्यात आले. राज्यपालांचा दत्तक असलेल्या भामरागड तालुक्यातील पर्लकोटाच्या पूल बांधकामाकडे शासनाकडे पुन्हा दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे भामरागड तालुक्यातील नागरिकांमध्ये पालकमंत्र्यांसह लोकप्रतिनिधीविषयी कमालीचा असंतोष वाढला आहे.
२००६-०७ मध्ये महापुरानंतर भामरागडवासीयांचे सांत्वन करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख स्वत: आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील व पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम हे ही उपस्थित होते. विलासराव देशमुख यांनी भामरागडच्या पर्लकोटा नदीचा पूल उंच करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर २०१० मध्ये जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा आर. आर. पाटील यांनी स्वीकारली. अनेकदा त्यांनी भामरागडला भेटी दिल्या. पालकमंत्री असताना नागपूर येथे रवी भवनात बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पर्लकोटा व कठाणी नदीचा पूल उंच करण्यासाठी काम सुरू करा, असे आदेश दिले होते. निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होईल, असे आश्वासनही ना. पाटील यांनी दिले होते. मात्र गडचिरोलीलगतच्या कठाणी नदीचा पूल उंच करण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. या कामासाठी १५ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
भामरागड हा राज्यपालांनी दत्तक घेतलेला तालुका असूनही येथील नवीन पूल बांधकामासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. हा अरूंद व ठेंगणा पूल असल्याने दरवर्षी पावसाळ्यात भामरागडचा सरासरी दोन महिने संपर्क तुटून राहतो. अनेकदा मागणी करूनही या पुलाचे काम करण्याकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये सरकारप्रती कमालीचा असंतोष वाढत आहे. (तालुका प्रतिनिधी)
भामरागड तालुका हा राज्यपालांनी दत्तक घेतलेला तालुका आहे. मात्र आजवर शासनाचे व प्रशासनाचे भामगरागड तालुक्याच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे भामरागड तालुक्यातील अनेक प्रश्न प्रलंबित आहे. अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्या वतीने भामरागड तालुक्याच्या प्रलंबित प्रश्नावर अनेकदा शासनाला निवेदन देण्यात आले. या निवेदनात पर्लकोटा नदीचा पूल उंच करण्याच्या प्रश्नाबाबतही मागणी करण्यात आली. परंतु शासनाचे भामरागडच्या विकासाकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
- रघुनाथ तलांडे, संस्थापक अध्यक्ष, अहेरी जिल्हा निर्माण कृती समिती